Devendra Fadnavis : काही ठिकाणी निश्चित तणावाची स्थिती..पेट्रोल-डिझेल बाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं महत्वाचं विधान
Devendra Fadnavis : स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमुळे भारतात हे पेट्रोल-डिझेलचं संकट निर्माण झालं आहे. पेट्रोल-डिझेलमुळे डॉलरसमोर रुपया रोज घसरतोच आहे. पण त्याहीपेक्षा आज पेट्रोल-डिझेल वेळेवर मिळत नाही ही खरी समस्या आहे.

सध्या राज्याच्या काही भागात पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली आहे. काही पेट्रोल पंपांवर रात्रीपासून वाहनांच्या रांगा लागत असल्याचं चित्र सतत येत आहे. ग्रामीण भागात पेट्रोल पेक्षा डिझेलच संकट जास्त दिसत आहे. सध्या शेती कामं सुरु झाली आहेत. त्यासाठी डिझेलची गरज लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सतत पेट्रोल-डिझेलचा साठा करु नका असं आवाहन करत आहेत. काही जण अफवांमुळे पेट्रोल पंपांवर गाडी, बाईकची टाकी फुल करण्यासाठी धाव घेत आहेत. हे सुद्धा पेट्रोल-डिझेलचा साठा लवकर संपण्यामागचं एक कारण आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेल बाबत महत्वाची माहिती दिली आहे.
“सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत. पेट्रोल-डिझेल विशेष करुन डिझेल काही लोक शेतीसाठी वापरतात. त्यामुळे स्वत: लक्ष घालून पेट्रोल-डिझेलची साठेबाजी करु देऊ नका. आवश्यकतेनुसार डिझेल मिळालं पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरु आहे. काही ठिकाणी निश्चित तणावाची स्थिती निर्माण झालेली आहे. पण सर्वदूर अशी स्थिती नाही. एखाद-दुसरी घटना होते, ती हायलाईट केली जाते. पण असं होऊ नये यासाठी प्रयत्न करतोय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पेट्रोल-डिझेलची साठेबाजी होणार नाही, यामध्ये मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचं आवाहन केलं.
तर ऊर्जा संकट अजून गंभीर होईल
स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमुळे भारतात हे पेट्रोल-डिझेलचं संकट निर्माण झालं आहे. पेट्रोल-डिझेलमुळे डॉलरसमोर रुपया रोज घसरतोच आहे. पण त्याहीपेक्षा आज पेट्रोल-डिझेल वेळेवर मिळत नाही ही खरी समस्या आहे. हॉर्मुज स्ट्रेटमध्ये जलवाहतूक अजून सुरळीत झालेली नाही. इराणने समृद्ध युरेनियम अमेरिकेकडे सोपवण्याची अट मान्य केली नाही, तर अमेरिकेकडून पुन्हा युद्धाची घोषणा होऊ शकते. तशी सध्या स्थिती दिसत आहे. कारण इराण अमेरिकेच्या अटी मान्य करायला तयार नाहीय. पुन्हा युद्ध सुरु झालं, तर ऊर्जा संकट अजून गंभीर होऊ शकतं.
खाद्यतेलाचा तुटवडा
पेट्रोल-डिझेल तुटवड्याचा परिणाम. जळगाव जिल्ह्यात खाद्य तेलाच्या किमतीमध्ये 3 ते 5 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. डिझेल तुटवडा, पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. ट्रान्सपोर्ट तसेच वाहतुकीचे दर वाढल्याने परिणामी खाद्यतेलाच्या दर वाढल्याची विक्रेत्यांची माहिती. डिझेल तुटवड्यामुळे खाद्य तेलाची वाहतूक करणारी वाहने तेल कंपन्यांमध्ये थांबून असल्याची विक्रेत्यांची माहिती. डिझेल वेळेवर मिळत नसल्यामुळे खाद्यतेलाची दररोज येणारी 15 ते 20 टँकर कंपन्यांमध्ये चार ते पाच दिवसांपासून उभे असल्याने खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
