CM फडणवीसांच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या, Video शेअर करत संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
Sanjay Raut : आज नाशिकमध्ये कुंभमेळ्याबाबत एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला आहे.

नाशिकमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून कुंभमेळा योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी विकासकामे करत आहे. अशातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये जाऊन विकास कामांची पाहणी केली. आज कुंभमेळ्याबाबत एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला आहे. राऊत यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कार्यक्रमावेळी रिकाम्या खुर्च्या असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना राऊत यांनी लिहिले की, नाशिक येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभ मेळ्या निमित्त नाशिकच्या जनतेला आमंत्रीत केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद! लोकांचा विश्वास यांच्यावर नाही, तरीही EVM मध्ये मते घुसवून विजय मिळवतात! आता याला फडणवीस काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
फडणवीस यांचे भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांना उत्तर
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कुंभमेळा कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत कामाच्या खर्चाबाबतचा रिपोर्ट जाहीर करा अशी मागणी केली होती. याबाबतच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले की, सगळ्या प्रोजेक्टबाबत माहिती जाहीर करण्यात आलेली आहे. लपलेला प्रोजेक्ट एकही नाही. सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे, त्यांनी ती माहिती चेक करून घ्यावी. ज्यांच्या मनामध्ये भ्रष्टाचार आहे, ज्यांच्या आचरणामध्ये भ्रष्टाचार आहे, त्यांना इथे रोज येऊन भ्रष्टाचार दाखवायचा आहे.
नाशिक येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभ मेळ्या निमित्त नाशिकच्या जनतेला आमंत्रीत केले होते, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद! लोकांचा विश्वास यांच्यावर नाही, तरीही evm मध्ये मते घुसवून विजय मिळवतात! pic.twitter.com/ku18bzSMaO
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 28, 2026
विरोधक खोटे आरोप करत आहेत…
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘रोज प्रत्येकाने बोलायचं भ्रष्टाचार होतो, जेणेकरून कुंभमेळा बदनाम झाला पाहिजे, ही विरोधकांची एक प्रकारची रणनिती आहे. ज्याप्रमाणे राम मंदिरामध्ये जी काही घटना घडली, त्यानंतर जणू काही सर्व पैसे चोरीला गेले, 1800 कोटींपर्यंत आकडा पोहोचला. आता ही त्यांची स्टॅटर्जी आहे की, ज्या ज्या ठिकाणी सनातन आणि हिंदू आस्था आहे, त्या ठिकाणी अशा पद्धतीने आरोप करत रहायचे, खोटं बोलत रहायचं. लोकांच्या मनात संभ्रम तयार करत रहायचा. पण त्यांनी कितीही संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न केला तरी ये पब्लिक है सब जानती है.’
