आता धारावीकरच उतरणार रस्त्यावर… अदानीच्या कार्यालयावर सोमवारी धडक, या मागणीसाठी थोपाटले दंड
धारावीकर 4 मे रोजी अदानीच्या माटुंगा कार्यालयावर धडकणार आहेत. धारावी बचाव आंदोलनतर्फे आयोजित या मोर्चात सर्व पात्र-अपात्र झोपडपट्टीवासीयांना धारावीतच 500चौ.फुटांची घरे मिळावीत आणि धारावीबाहेर पुनर्वसन होऊ नये, या प्रमुख मागण्यांवर जोर दिला जाईल. अदानी आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याने हा भव्य मोर्चा काढण्यात येत आहे. कोळीवाड्याला पुनर्विकासातून वगळण्याची मागणीही कायम आहे.

येत्या 4 मे रोजी धारावीकर नागरिक हे अदानीच्या कार्यालयावर धडकणार आहेत. धारावी बचाव आंदोलनकडून मोर्चाची जोरदार तयारी सुरू असून त्याचअंतर्गत हा मोर्चा काढण्यात येणार असून ते रस्त्यावर उतरणार आहेत. सर्व पात्र-अपात्र झोपडपट्टीवासीयांना धारावीतच 500 चौरस फुटाची घरं देण्यात यावीत, तसेच कोणत्याही झोपडपट्टीवासीयाचे धारावीबाहेर पुनर्वसन करण्यात येऊ नये इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी धारावीकर एकजूट होऊन सोमवार 4 मे रोजी सकाळी 11 वजात अदानी कंपनीच्या माटुंगा येथील कार्यालयावर धडकणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
अदानी कंपनी आणि राज्य सरकारकडे वारंवार विनंती करण्यात आल्या, मात्र तरीही रहिवाशांच्या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे, त्यामुळेच आता धारावी बचाव आंदोलनतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पातून कोळीवाडा वगळा
धारावी पुनर्विकास प्रकल्पातून कोळीवाडा वगळण्याबाबत कोळी जमात ट्रस्ट ही संस्था अजूनही आक्रमक आहे. कोळी बांधव हे या मुंबईचे भूमिपुत्र आहेत ,त्यांना त्यांची संस्मृती, पारंपरिक व्यवसायाचे जतन करायचं आहे. त्यामुळेच धारावी पुनर्विकास प्रकल्पातून त्यांना बाहेर ठेवावे ही त्यांची मागणी अतिशय रास्त आहे. यासंदर्भात हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करता येईल, असे बाबुराव माने यांनी सांगितलं. कोळी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, असे खासदार अनिल देसाई यांनी नमूद केलं.
मुंबईच्या मध्यभागी तब्बल 600 एकरवर धारावी पसरली आहे, धारावी येथील झोपडपट्टीत सव्वा लाख झोपडीधारक राहतात. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या (डीआरपी) मास्टर प्लॅनला राज्य सरकारने मंजुरी दिली होती. हा प्रकल्प क्लस्टर-आधारित विकास तंत्रावर भर देतो, ज्यामध्ये कॉम्पॅक्ट परिसर असतील. प्रत्येक क्लस्टरमध्ये विविध निवासी, व्यावसायिक आणि सामाजिक सुविधा असणार आहेत, यासोबतच यामध्ये मुलांसाठी खेळाचे मैदान आणि लघु उद्योजकांसाठी सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. धारावीमधील रस्त्यांचा देखील विकास करण्यात येणार आहे. धारावीचा पुनर्विकास अदानी समूहाच्या नवभारत मेगा प्रा. लि. मार्फत करण्यात येणार आहे. ही कंपनी एसआरएमार्फत धारावीतील झोपडय़ांचे सर्वेक्षण करतेय. परंतु या सर्वेक्षणात केवळ पाच हजार झोपडय़ाच पात्र झालेल्या आहेत. मोठय़ा प्रमाणात धारावीकरांना अपात्र ठरवून त्यांना धारावीच्या बाहेर फेकण्याचा अदानीच्या कंपनीचा डाव असून त्यामुळे रहिवाशांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत संघटनेची बैठक नुकतीच शिवसेना भवन येथे पार पडली होती.
