हा तर जातीचा वाद… घ्या तुमच्या दैवताची शपथ अन् सांगा… अभिमन्यू पवारांच्या वागण्यावर मेधा कुलकर्णी भडकल्या
पुण्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलंच नाराजीनाट्य रंगल्याचं पहायला मिळत आहे. कार्यक्रमामध्ये पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला,

पुण्यातील भाजपच्या नेत्यांमध्ये चांगलंच नाराजीनाट्य रंगल्याचं पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यात आज युपीएससी, एमपीएससीतील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला. सारथीच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून आमदार अभिमन्यू पवार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला, त्यानंतर मेधा कुलकर्णी रागातच कार्यक्रमस्थळावरून निघून गेल्या, या घटनेवर प्रतिक्रिया देताना आता मेधा कुलकर्णी यांनी गंभीर आरोप केले आहेत.
नेमकं काय म्हणाल्या मेधा कुलकर्णी?
सर्व प्रथम मी त्या मुलांचं अभिनंदन करते, त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून आजचा कार्यक्रम होता. मी देवेंद्र फडणवीस यांचं देखील अभिनंदन करते, की त्यांनी सारथीच्या माध्यमातून होतकरू विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी उत्तम अशी यंत्रणा तयार केली. अतिशय चांगल्या मनस्थितीमध्ये मी त्या कार्यक्रमाला गेले होते. पहिल्या रांगेमध्ये काही रिकाम्या खुर्च्या होत्या. अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे बरेच लोक आले नव्हते. त्यामुळे खुर्च्या रिकाम्या होत्या, अधिकारी असं म्हणत होते की जर खुर्च्या रिकाम्या असतील तर मेधा कुलकर्णी यांचा प्रोटोकॉल इमिजेट आहे. कारण खासदार म्हणून तिथे कोणीच नव्हतं आणि शिवाय माझ्याकडे एक कमिटीचं अध्यक्षपद देखील आहे. म्हणून अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही इथे बसा. मी त्यांना म्हटलं की नरेंद्र पाटील देखील इथे बसू शकतात, कारण ते महामंडळाचे अध्यक्ष आहेत. ते आमदार असले तरी महामंडळाचे अध्यक्ष आहेत.
अभिमान्यू पवारांना त्या ठिकाणी स्वत:ला बसायचं होतं. म्हणून त्यांची धावपळ सुरू होती. अभिमान्यू पवार असं म्हणाले की, हा कार्यक्रम मराठा समाजाचा आहे, तुम्ही तिथे बसलात तर वाद होईल. कार्यक्रम काय चाललाय तुम्ही काय बोलतायते, मला तिथे सपोगेट झालं मी तिथून निघून आले. हा कार्यक्रम वेगळा आहे, मग तिथे जातीचा विषय कशाला? दरम्यान त्यानंतर नरेंद्र पाटील यांनी म्हटलं की तिथे असं काही घडलंच नाही, त्यावर देखील यावेळी मेधा कुलकर्णी यांनी उत्तर दिलं आहे, त्यांनी त्यांच्या प्रिय व्यक्तीला स्मरून सांगावं की अभिमान्यू पवार हे वाक्य बोलले की नाही, असंही यावेळी मेधा कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
