मुंबईतील महत्वाच्या 4 रेल्वे स्टेशनमधील पाण्याच्या कूलरमध्ये आढळला भयनक जिवाणू , कॅगच्या रिपोर्टनंतर प्रवाशांमध्ये खळबळ
मुंबईतील महत्वाच्या 4 रेल्वे स्टेशनमधील पाण्याच्या कूलरमध्ये भयनक जिवाणू आढळल्याची बाब समोर आली आहे. कॅगच्या रिपोर्टनंतर प्रवाशांमध्ये एकचत खळबळ उडाली आहे.

देशभरातील काही रेल्वे स्टेशनवरील वॉटर कूलरच्या पाण्यात ई-कोलाय भयानक जिवाणू आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात मुंबईतील चार रेल्वे स्टेशनचाही समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, भिवंडी रोड , कल्याण, लोणवळा या रेल्वे स्टेशनमधील वॉटर कुलरमध्ये ई-कोलाय आढळल्याची धक्कादायक माहिती कॅगच्या अहवालातून समोर आली आहे. या माहितीने रेल्वे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.
कॅगच्या रिपोर्टमधून रेल्वे स्थानकांच्या कूलरमधील पाण्याबाबत ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेनंतर CSMT, कल्याणसह 412 स्थानकांवरील पाण्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. संसदेत सादर झालेल्या कॅगच्या अहवालात देशभरातील 512 रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी करण्यात आली. त्यानंतर 412 बिगर-उपनगरीय स्थानकांतील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेत त्रुटी आढळल्याचं अहवालातून समोर आलं आहे.
मध्य रेल्वेतील CSMT, कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळ्यासह दक्षिण रेल्वेतील कोईम्बतूर-पलक्काड, दक्षिण मध्य रेल्वेतील हैदराबाद आणि पूर्व रेल्वेतील मधुपूर स्थानकांचा अहवालात समावेश आहे. पाण्याच्या नमुन्यांमध्ये ‘टोटल कोलिफॉर्म’ आणि काही ठिकाणी ई-कोलाय जीवाणू आढळल्याची नोंद झाली आहे. या दूषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यात कल्याण रेल्वे स्थानकाचा समावेश असल्याने हजारो प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कल्याणमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसह लोकलने प्रवास करणारे प्रवासीही मोठ्या संख्येने पाणी वापरतात.
स्थानकावर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य निर्माण झालं आहे. याच वातावरणात पाणी प्यावे लागते, त्यामुळे प्रवासी आजारी पडण्याची शक्यता आहे, असा संताप कल्याण स्थानकातील प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी द्यावे, स्थानकाची नियमित स्वच्छता करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
कॅगच्या अहवालानंतर कल्याण स्थानकातील संपूर्ण परिस्थितीवर प्रश्नचिन्ह करण्यात आले आहेत. केवळ पाणीच नाही तर 512 पैकी तब्बल 458 स्थानकांवर प्रतीक्षागृह, शौचालये, पंखे, कचरापेट्या, पादचारी पूल आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये कमतरता आढळल्याचे कॅगच्या निरीक्षणातून समोर आलं आहे. पाण्याची सर्वसमावेशक गुणवत्ता तपासणी करून नियमांचे काटेकोर पालन करण्याची कॅगची रेल्वेला शिफारस केली आहे. या अहवालानंतर कल्याण रेल्वे स्थानकावरील प्रवासी सुविधांवर प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
