‘…म्हणून मी दरेगावला आलो’, एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा

येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे, या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे, मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे हे आपल्या मुळगावी दरेगावला गेल्यानं चर्चेला उधाणा आलं होतं, अखेर याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

...म्हणून मी दरेगावला आलो, एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
| Updated on: Dec 01, 2024 | 3:58 PM

येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी साताऱ्यातील दरेगाव इथे गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा देखील सुरू आहे. मात्र आता या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी दरेगाव इथे पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

एकनाथ शिंदे हे दरेगावला का गेले? ते नाराज आहेत का? असा सवाल सातत्यानं उपस्थित करण्यात येत होता. यावर बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे. सत्तास्थापन होत असताना गावी जायचं नाही का? असा प्रश्न त्यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, मी नेहमी गावी येत असतो. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं आहे. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. त्यामुळे मला माझ्या मुळगावी आल्यानंतर एक वेगळा आनंद होतो. आपल्या लोकांना भेटल्याचा आनंद मिळतो, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे घेतील. मी कॉमन मॅन म्हणून काम केलं. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडक्या शेतकऱ्यांसाठी काम केलं. अडीच वर्षांमध्ये आम्ही भरभरून काम केलं. मी देखील शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मला सर्व सामान्य लोकांना काय पाहिजे याची चांगली जाणीव आहे. त्यामुळे लोकही या सरकारला आपलं लाडकं सरकार म्हणतात. महाविकास आघाडीने जे प्रकल्प रखडवले होते, त्याला आम्ही चालना दिली, लोकांनी देखील आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us