शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर मोठा आरोप

Raju Shetti : मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे.ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. यावर राजू शेट्टी यांनी भाष्य केले आहे.

शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, शेतकरी कर्जमाफीवरून राजू शेट्टींचा सरकारवर मोठा आरोप
Raju Shetti
Image Credit source: Google
| Updated on: Mar 06, 2026 | 6:19 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचं दोन लाखांपर्यंतच कर्ज थकीत आहे, त्यांना कर्जमाफी मिळणार आहे. सरकारच्या या घोषणेनंतर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांचा विश्वासघात केला – राजू शेट्टी

राजू शेट्टी यांनी म्हटलं की, शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. ऑक्टोबर महिन्यात आंदोलनानंतर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण कर्जमाफी केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. बहुतांश शेतकऱ्यांची पीक कर्जे ही साडेतीन ते चार लाख इतकी आहेत. दोन लाखांच्या वरची रक्कम भरल्याशिवाय त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मेटाकुटीला आलेला शेतकरी दोन लाखांच्या वरची रक्कम कशी भरणार हा प्रश्न आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सरकारने दिलेल्या आश्वासनामुळे जो शेतकरी नियमित कर्ज भरत होता तो देखील आता थकीत झाला आहे. सरकारने केलेली ही कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे असा प्रश्न पडतो.

राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयावर बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे. तसेच, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो.

सरकारने सरसकट कर्जमाफी केली नाही – यशोमती ठाकूर

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अर्थसंकल्प आणि कर्जमाफीवर बोलताना म्हटले की, आजचा राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीची फेकाफेक होती. जसं गाजर केंद्र सरकारने दिलं तसं गाजर आता राज्य सरकारने आपल्याला दिलं आहे. सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र ही सरसकट कर्जमाफी देत नाही दोन लाखांपर्यंत फक्त कर्जमाफी देणार आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.

Follow Us