शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही पूर्ण केलं, विकसित महाराष्ट्राची थीम असलेला अर्थसंकल्प – CM फडणवीस
CM Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 2026-27 वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात मुख्यमंत्र्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात गावापासून शहरांपर्यंत, शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांसाठीच्या घोषणांचा समावेश आहे. तसेच या अर्थ संकल्पात काही नवीन योजनाही जाहीर करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पानंतर मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषदेत घेत अर्थसंकल्पावर भाष्य केले. या नेत्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
सर्व समावेशक अर्थसंकल्प – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, विकसित महाराष्ट्रासाठी जी थीम तयार केली आहे, यावर आधारित हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प सर्व समावेशक आहे. 2 लाखांपर्यत कर्जमाफी आम्ही जाहीर केलीय. उत्पादन खर्च 25 टक्क्यांनी कमी आणायचा आणि उत्पादकता वाढवायची असा हा अर्थसंकल्प आहे. 7 लाख 69 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आहे. विकसित महाराष्ट्र 2047 या संकल्पनवरून हा अर्थसंकल्प तयार केला आहे. जाणीवपूर्वक रोडमॅप तयार केलाय त्यावर आधारित पहिला अर्थसंकल्प आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की, मला सांगताना आनंद वाटतो, विधानसभा निवडणुकीत शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिलं होतं, ते आश्वासन पूर्ण केले आहे. शेतीत एआयचा उपयोग करत उत्पादन खर्च कमी आणायचा या उपाययोजना सांगितलेल्या आहेत. ॲग्रीस्टॅक आणि महाविस्तार हे दोन प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेत. फोटो टाकला तरी पीकांची परिस्थिती काय हे कळू शकेल. कोणत्याही तज्ञाची आवश्यकता भासणार नाही. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचे काम जोरात सुरु आहे, 13-14 हजार मेगावॉट पर्यंत आपण पोहोचू. सकाळी देखील शेतकऱ्यांना आम्ही वीज देऊ शकू. शेत मजुरांना सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सगळ्याच क्षेत्रात डिजिटायझेशन करण्याचा आपला प्रयत्न आहे. नदीजोड प्रकल्पासंदर्भात जागतिक बँकेने आपल्याला पैसे दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मोफत वीजसाठी 32 हजार कोटी दिलेत अशी माहिती फडणवीसांनी दिली.
जगातील 30 व्या नंबरची अर्थव्यवस्था
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, 51 लाख कोटी रुपयांची आपली अर्थव्यवस्था आहे. जगातील देशात 29 देश आपल्या पुढे आहेत. म्हणजेच जागतिक पातळीवर विचार केल्यास जगातील 30 व्या नंबरची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची आहे. अनेक महत्त्वाच्या देशांपेक्षा मोठी अर्थव्यवस्था आपली आहे. मला विश्वास आहे ह्या गतीने वाढत राहिलो तर तिसरी अर्थव्यवस्था आपली बनेल.
व्हिजन असलेला अर्थसंकल्प – एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अर्थसंकल्पावर दुखाचे सावट होते, अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. व्हिजन असलेला अर्थसंकल्प आहे, व्हिजनरी आणि खंबीर वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे. अनेक प्रकल्प घेतलेत, अनेक योजना बंद होणार असं बोललं जात होतं. मात्र, आम्ही अनेक गोष्टी घेतल्या, रस्त्यांचे जाळे निर्माण करणार आहोत. शहरासोबत ग्रामीण विकास झाला पाहिजे. मेट्रो, रस्ते जाळे तयार करण्याचा विचार आहे. 8.10 लाख कोटींची कामं आपल्याकडे सुरु आहेत, पायाभूत सुविधांची कामं सुरु आहेत. मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणे असेल, वाढवणपर्यंत कनेक्टिविटी असेल याची कामे सुरू आहेत. विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा अर्थसंकल्प आहे.
विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने चालना देणारा – अर्थसंकल्प
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, हा अर्थसंकल्प अजित पवार यांना समर्पित केल्याबद्दल आभार मानते. नागरी पुरस्कार सुरु करण्याबद्दल आभार, हीच त्यांना खरी आदरांजली असेल. विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने चालना देणारा असा अर्थसंकल्प आहे. दादांनी मांडलेल्या अर्थसंकल्पासोबत सुसंगत अशी मांडणी ह्या अर्थसंकल्पाची दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग अर्थसंकल्पातून करण्यात आला त्यासाठी आभार. कृषी, पर्यटन, उद्योग आणि सेवेचा विस्तार करण्याचा प्रयत्न झाला आहे. पायाभूत सुविधांच्या अर्थसंकल्पात 20 टक्के वाढ केल्याने फायदा होईल. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असलेल्या वळू ठिकाणाचे स्थळ विकसित करण्यात येणार आहे. लखपती दीदीच्या माध्यमातून ठोस पावलं उचलण्यात येत आहे. मुंबई महानगरच्या धर्तीवर पुणे, नाशिक, संभाजीनगर येथे ग्रोथ हब तयार करण्यात येणार आहे. शेतकरी, कष्टकरी आणि महिला तरुणांच्या विकासासाठी महत्त्वाचा असा अर्थसंकल्प असेल.
