तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…
Siya Goyal : सिया गोयलच्या कुटुंबियांना अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका दिला आहे. सियाच्या वडिलांचे दुकान आता FDA कडून सील करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची संपूर्ण देशात चर्चा आहे. लोहगड किल्ल्यावरून खाली ढकलून केतनची हत्या करण्यात आली होती. केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतनचा काटा काढल्याचे समोर आले आहे. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी सुरू आहे. अशातच आता सिया गोयलच्या कुटुंबियांना अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दणका दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सिया गोयलच्या वडिलांचे दुकान सील
सिया गोयलच्या कुटुंबियांना तुकाराम मुंडे यांनी दणका दिला आहे, सियाच्या वडिलांच्या दुकानावर एफडीएने कारवाई केली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात असणारे हे दुकान एफडीएने सील केले आहे. व्यवसायाचा परवाना नसून दुकानातील माल निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप करत एफडीएने दुकाल सील केले आहे. तसेच आठ लाख रुपये किमतीचा 4 हजार किलो माल एफडीएकडून जप्त करण्यात आला आहे. हा सिया गोयलच्या कुटुंबियांना मोठा धक्का मानला जात आहे.
केतन अग्रवाल याच्या आईने PM मोदी यांना पत्र
केतन अग्रवाल यांचे कुटुंब सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. अशातच आता केतनच्या आईने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी म्हटले की, ‘प्रत्येक आईप्रमाणे, मी स्वप्न पाहिले होते की केतन एक सुंदर आयुष्य घडवेल, लग्न करेल आणि आमच्या म्हातारपणात साथ देईल. पण त्याऐवजी, मला माझ्या मुलावर अंत्यसंस्कार करावे लागले. माझ्या मुलाची निर्घृणपणे हत्या झाली आणि त्याच्यासोबत माझे संपूर्ण जग उद्ध्वस्त झाले.’
केतनच्या आईने पत्रात पुढे म्हटले की, ‘आमच्या घराचा प्रत्येक कोपरा मला त्याची आठवण करून देतो. त्याची खोली, त्याचे कपडे, त्याचे फोटो मला दररोज आठवण करून देतात की तो कधीही परत येणार नाही. मात्र मी जेव्हा त्यांच्या फोटो समोर उभी राहते तेव्हा मला असं वाटतं की त्याची आई त्याचासाठी लढा देत आहे. माला वटतंय की एका दिवशी मी त्याला सांगेन की मी तुला न्याय मिळवून दिला. मी कोणतीही सहानुभूती किंवा विशेष मेहेरबानी मागत नाहीये. मी फक्त न्यायाची मागणी करत आहे.’