
रामदास कदम यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांनंतर उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याच्या नजरा असताना उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दांमध्ये रामदास कदम यांचा विषय संपवला. बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस का ठेवली? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही, असे म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपांवर थेट भाष्य केले.
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकमान्य टिळक प्रश्न विचारू शकतात. तर आपणच निवडून दिलेल्या सरकारला प्रश्न विचारणाचा अधिकार गमावून बसलो आहोत का. गमावून बसलो असू तर आपण पत्रकार म्हणून घेऊ शकतो का. हाच एक प्रश्न आहे. त्यामुळे पत्रकारांनी दूध का दूध आणि पानी का पानी केलं पाहिजे. अंधभक्त जन्माला आले आहेत. त्यांना दृष्टी देण्याचं काम आपण केलं पाहिजे.
राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो. त्यानंतर एका मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. आणि रोज उठून आम्ही एकत्र आलो. एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही. 5 जुलैला मेळावा घेतला. एकत्र यायचं नसतं तर मेळाव्यात सोबत आलो नसतो. त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांचा नख लावण्याचा प्रयत्न आहे.
त्या दिवशी राज ठाकरे भाषण करत नव्हते. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. आमच्या दोन तीन भेटी झाल्या आहेत. काही गोष्टी व्यवस्थित होऊ द्या ना, असेही त्यांनी म्हटले. दसरा मेळाव्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, शिवाजी पार्कात मी भाषण थांबवू का म्हटलं तरी भाषण चालू ठेवा म्हणतात. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे हात अधिक आहेत.
आघाडी म्हणून निवडणूक लढवणार का? यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले, हा प्रश्न तिन्ही पक्षाने सोडवला पाहिजे. लोकसभा आणि विधानसभा एकत्र लढलो. तिन्ही पक्षाने एकत्र लढलं पाहिजे. तिन्ही पक्षांना वाटलं एकत्र लढायचं तर लढू शकतो. पण कुणाला वाटलं स्वतंत्र लढायचं तर तसं होऊ शकतं. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांच्या भावनाही समजून घेऊ.