विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश
विरारच्या अर्नाळा बिचवर पोहण्यास गेलेली चार अल्पवयीन मुले समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. यापैकी दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे. तर दोन मुलांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.

विरार येथील अर्नाळा बिचवर पोहण्यास गेलेल्या मुलांपैकी चार मुले सकाळी बुडाल्याची घटना घटना घडली आहे. त्यातील दोन मुलांना स्थानिकांच्या मदतीने लाईफ गार्डनी वाचवले आहे. तर दोन मुलांचा अद्याप शोध सुरु असल्याचे सांगण्यात येते. ज्या मुलांचा शोध सुरु आहे ती मुले नालासोपारा येथील असल्याचे सांगण्यात येत आहे,समुद्र खवळलेला असल्याने या मुलांच्या शोध मोहिमेत अडथळे येत आहेत.
विरारच्या अर्नाळा समुद्रात गुरुवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास दहा ते बारा वर्षांची मुले खेळण्यास गेली होती. त्यावेळी जोरदार समुद्री लाटांना या मुलांना समुद्रात ओढले, किनाऱ्यांवरील लोकांनी आरडाओरडा गेल्याने स्थानिक मच्छीमार आणि लाईफगार्ड यांनी यापैकी दोन अल्पवयीन मुलांना वाचवले. मात्र, त्यांचे दोन साथीदार जोरदार लाटांच्या तडाख्यात समुद्रात बुडाल्याचे म्हटले जात आहे . दोन्ही मुले नालासोपारा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या शोधासाठी अर्नाळा पोलीस आणि जीव रक्षक यांच्या मदतीने शोध मोहिम सुरू आहे.
भरतीमुळे शोधकार्यात अडथळे
गुरुवारी सकाळी ९ वाजता अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेली चार अल्पवयीन मुले खोल समुद्रात उतरली होती. या मुलांना लाटांनी आत ओढुन नेले. या मुलांच्या आरडाओरडा ऐकून स्थानिकांनी पोलिसांना कॉल केला. दोघांना वाचविण्यात लाईफ गार्डना यश आले. परंतू शोएब झाकीर अहमद खान (वय १७), आयन झाकीर हुसेन मंडळ (वय १९) असे समुद्रात बुडालेल्या मुलांची नावे असून त्यांचा शोध सुरु आहे. मात्र, समुद्राला भरती असल्याने शोधकार्यात अडथळा निर्माण होत असल्याने ओहटीपर्यंत शोधकार्य थांबविले आहे. आज रात्रीपर्यंत मुलांचा शोध लागेल असा विश्वास तपास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नालासोपारा येथील मुले
विरारच्या अर्नाळा समुद्रात १४ ते १७ वयोगटातील चार मुले पोहण्यास गेली होती. या मुलांनी समुद्रात उतरुन पोहण्यास सुरुवात केली. मात्र, भरती असल्याने ही मुले नाकातोंडात पाणी गेल्याने बुडाली. किनाऱ्यावर पेट्रोलिंग करणाऱ्या अर्नाळा पोलीस, होमगार्ड, जीव रक्षक, अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ समुद्रात जावून शोध कार्य सुरु केले, त्यांना दोन मुलांना वाचविण्यात यश आले. तर दोन मुले समुद्राच्या भरतीत वाहून गेली. नालासोपारा पश्चिम सखर मोहल्ला येथील ही चार मुले आहेत. समुद्र किनाऱ्यावर धोकादायक स्थितीत आत जावू नये असे फलक पोलिसांनी जागोजागी लावून आवाहन करून सुद्धा तरुण पाण्यात उतरत असल्याने बुडण्याच्या घटना घडत आहेत.