मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाबाबत सरकारची भूमिका काय, गिरीश महाजनांनी स्पष्टच सांगितलं
मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अखेर मुंबईमध्ये आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. 15 सप्टेंबरला जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. यावर आता गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 15 वा दिवस आहे. दरम्यान त्यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये मराठा बंधवांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये त्यांनी आपल्या मुंबईमधील आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 15 सप्टेंबर रोजी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. त्यांचा पहिला मुक्काम हा 15 सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असणार आहे. तर दुसरा मुक्काम हा 16 सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रींगोदा येथे असणार आहे. तिसरा मुक्काम 17 सप्टेंबर रोजी पुण्याती हडपसर येथे असणार आहे. तर चौथा मुक्काम 18 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीमध्ये असणार आहे. तर 19 तारखेपासून मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात करणार आहेत. या आंदोलनावर आता मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारचं बोलणं सुरू आहे. मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. – गणेशोत्सव मोठा उत्सव आहे. हा सर्वात मोठा आपला उत्सव आहे. या काळात मुंबईमध्ये मोठी गर्दी होते. महिला, मुले रस्त्यावर असतात. मला वाटतं ही वेळ त्यांनी टाळली पाहिजे. त्यांना अधिकार आहे उपोषण करण्याचा, आंदोलन करण्याचा, मोर्चा काढण्याचा, परंतु ही वेळ काही योग्य नाही. त्यांनी अजूनही विचार करावा, असं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आंदोलनाला परवानगी घ्यावी लागेल, परवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही, असं मुंबई हाय कोर्टाने म्हटलं आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या त्यबेतीची तपासणी करण्याच्या सूचना देखील हाय कोर्टाने दिल्या आहेत. त्यामुळे आता सरकार या आंदोलनाला परवानगी देणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या या आंदोलनावर ठाम आहेत.
