मार्चच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात उष्णतेची लाट, कुठे सकाळच्या सत्रात शाळा, कुठे रस्ते निर्मनुष्य
अजून मार्च महिन्याची सुरुवात झाली नाही तोच राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३८ अंश डिग्री सेल्सिअसवर पोहचले आहे. त्यामुळे जळगावात सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यात मार्च महिन्याचा पहिल्याच आठवड्यात तापमानात वाढ झाली आहे. अमरावतीत मार्च महिन्यात पहिल्याच आठवड्यात काल ३९ अंश डिग्री सेल्सिअसवर तापमान गेल्याने मार्च महिन्यातील पहिल्याच आठवड्यात तापमानाचा १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असून उन्हाच्या झळांपासून वाचण्यासाठी दुपारच्या वेळी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन लोकांना करण्यात आले आहे.
अमरावतीत मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात काल तापमान ३९ डिग्री सेल्सिअसच्या उंबरठ्यावर गेले होते. मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या तापमानाचा गेल्या १४ वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. अचानक वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर दुचाकीस्वारांना उन्हापासून स्वत:चा बचावा करण्यासाठी तोंड आणि डोके झाकावे लागत आहे.हवामान विभागाने पुढील चार-पाच दिवस तापमान वाढ कायम राहण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
चिपळूण आणि खेड तालुक्यात उष्णतेचा पारा चढला
मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच चिपळूण आणि खेड तालुक्यात उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून चिपळूणमधील कमाल तापमान तब्बल ३८ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचले आहे. दुपारच्या वेळी उन्हाचा तडाखा अधिक जाणवत असून रस्त्यांवरील वर्दळ काहीशी कमी झालेली दिसत आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या सुमारास नागरिक सावलीचा आधार घेताना तसेच थंड पेयांकडे वळताना दिसत आहेत. मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात झालेल्या या वाढीमुळे यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुढील तीन दिवस कोकणात तापमान वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आले आहे. कोकणात हवामान विभागाने तापमानाचा येलो अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील तापमानाचा पारा ३८ अंशाच्या वरती जाण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसात तापमानात दोन ते तीन अंशाने वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. किनारपट्टी भागात तापमान वाढीमुळे हवेतील आद्रता वाढणार आहे.
जळगावात शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश
जळगावात उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी याबाबचे आदेश काढले असून सीबीएसई वगळता सर्व इंग्रजी माध्यमांनाही आदेश लागू करण्यात आले आहेत. उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिक्षक संघटनांनी केलेल्या मागणीचा विचार करून आणि विद्याथ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा मधला मार्ग काढण्यात आला आहे.
दरम्यान,येत्या १५ मार्चपर्यंत सौम्य उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा ९ मार्चपासून सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी दिले आहे
चंद्रपूरची जगात अतिउष्ण शहर म्हणून नोंद
चंद्रपूर जिल्ह्यातही तापमानात मोठी वाढ झाली असून तापमान ३८ डिग्री सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे. तापमान ३८ डिग्री सेल्सिअस इतके नोंदले गेले आहे. चंद्रपूरची जगात अतिउष्ण शहर म्हणून नोंद आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात उष्णतेत मोठी वाढ झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. यामुळे दुपारी १२ ते ४ यावेळेत चंद्रपुरातील रस्ते निर्मनुष्य होत आहेत. आता मार्चच्या पहिल्याच आठवड्यात ही स्थिती असताना तापमानाचा पारा दिवसेंदिवस उचांक गाठत असल्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात काय होणार असा विचार करून लोकांची चिंता वाढली आहे.
