Monsoon update : पावसाने चाल बदलली, आता या तारखेपासून राज्यात मुसळधार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज

महाराष्ट्रात मान्सूनच आगमन झालं आहे, मात्र पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये अजूनही पाऊस झालेलाच नाही, या सर्व पार्श्वभूमीवर आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा पावसाचा नवा अंदाज समोर आला आहे.

Monsoon update : पावसाने चाल बदलली, आता या तारखेपासून राज्यात मुसळधार, पंजाबराव डख यांचा नवा अंदाज
Weather expert Punjabrao Dakhs new monsoon forecast
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2026 | 9:13 PM

राज्यात मान्सून दाखल झाला आहे, परंतु अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊसच झालेला नाहीये, त्यामुळे आता सर्वांचेच डोळे हे मान्सूनच्या वाटचालीकडे लागले आहेत. चिंतेची बाब म्हणजे सुरुवातीला महाराष्ट्रात मान्सूनच आगमन झाल्यानंतर 15 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD)  वर्तवण्यात आला होता, मात्र आता हा अंदाज चुकताना दिसत आहे. हवामान विभागानं जारी केलेल्या नव्या अंदाजानुसार आता 20 जून नंतराच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही पुढील चार ते पाच दिवस पावसाची प्रतिक्षाच करावी लागणार आहे. वीस जून नंतर महाराष्ट्रात पावसाच्या आगमनाची शक्यता आहे.

यंदाच्या मान्सूनवर अल निनोचं सावट आहे, त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार असल्याचा अंदाज आधीच हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यातच आता राज्यातील मान्सूनची वाटचाल देखील मंदावल्याने काळजीत भर पडली आहे. परंतु दिलासादायक बातमी म्हणजे येत्या 20 तारखेनंतर राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील पावसाचा आपला सुधारीत अंदाज वर्तवला आहे.

शेतकऱ्यांनी काळजी करू नये, राज्यात पाऊस पडणार आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. मान्सूनची वाटचाल थोडी मंदावली आहे, परंतु जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रभर जोरदार पाऊस होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. अनेकजण दावा करत आहेत की यंदा दुष्काळ पडणार आहे, परंतु तसं काही नाही, यंदा राज्यात परतीचा पाऊस जोरदार होईल, त्यामुळे खरीप तसेच रब्बी दोन्ही हंगामातील पिके चांगली येतील असा अंदाज देखील पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा इशारा 

दरम्यान दुसरीकडे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. परंतु जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरण्याची घाईल अजिबात करू नये, असा सल्ला देखील हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

 

Follow Us