मनाचे श्लोक वाचले तर कोणीच भाजपात जाणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

आज राज्यभरात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राज्याच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्थानीय लोकधिकार समितीच्या वतीने मरीन लाईन्स येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच भाजपवर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
आज आपल्या मातृभाषेचा दिन – उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, आज आपल्या मातृभाषेचा दिन आहे. आपल्यासाठी हा रोजच मराठी भाषा दिन असला पाहिजे. आज जादूची पेटी हा अप्रतिम कार्यक्रम अनुभवला. आपल्या आयुष्यात मतपेटी कायमच असते थापा ऐकत असतो पण आज ढोलकीवरची थाप ऐकली. शब्द आणि सूर यांच नातं आहे. पेटी माझ्यासाठी नवीन नाही. काका श्रीकांतजी घेऊन बसायचे अनेकजण घरी यायचे. कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही.
मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा सक्तीची केली
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा सक्तीची केली. काल पुन्हा ते बोलले त्यांची सवय आहे की जुनं दळण पुन्हा दळायचं. अहवाल दिला तो स्वीकारला, पण लागू करायच्या अगोदर गुवाहाटीला गेले. मराठी भाषा भवन अजून झालेलं नाही. मराठी भाषा भवन उभ राहील नाही पण भाजपचं कार्यालय उभ राहतंय. कसले तुम्ही मुख्यमंत्री.
भाजप संस्कार मारून टाकत आहे
उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘देशावर कोणताही घाला येवो पहिला महाराष्ट्र धावून जातो. आज परत गरज आहे. संपूर्ण बंगाल ममता यांच्या मागे उभा राहतो. आम्हाला भाषेचा अभिमान जरुर आहे, हिंदुस्थान आमचा आहे. प्रत्येक राज्याला राज्य मिळाल, भाषा मिळाली प्रत्येकाने सुखाने राहा, घरावर मालकी सांगायला लागले मग सहन कस करायचं? भाजपची एक नीती आहे, संस्कार मारून टाकायचं. आता आम्हाला भीती वाटतेय की जणगणमन संपवून टाकतील की काय?’
शिवसेना संपवून टाकायची आहे
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, ‘यांना सगळे पक्ष नकोत म्हणून शिवसेना संपवून टाकायची आहे. शिवसेना पुरून उरणार. शिवसेना नसती तर मराठी माणसाची हालत काय झाली असती असे प्रश्न आपल्याला विचारतात. अजूनही आम्ही आमचा नेता सोडलेला नाही. नेता बदलला नाही. अदला बदल करणारे आम्ही नाही. आम्ही मराठी माणसाठी काय केलं हे सांगतो. भाजप मराठी माणसाठी किती रस्त्यावर उतरला हे त्यांनी सांगावं.
मनाचे श्लोक वाचले तर…
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘कोणीही येतोय आणि हनुमान चालीसा शिकवतोय. आजपासून ज्ञानेश्वरी द्यायची, मोदी आली तरी ज्ञानेश्वरी द्यायची. मनाचे श्लोक रोज कोणी वाचले तर कोण त्या भाजपात जाणार नाही एवढी ताकद त्यात आहे. मराठी श्लोकांचे हिंदीकरण करून संपूर्ण देशात वाटले पाहिजेत.’
