Weather Update : महाराष्ट्रावर सर्वात मोठं संकट, पुढील 48 तास धोक्याचे, गरज असेल तरच बाहेर पडा, IMD चा मोठा इशारा
राज्यात आता उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे, अनेक जिल्ह्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. मात्र याच दरम्यान आता हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्राला पुन्हा एकदा पाऊस झोडपून काढणार आहे. हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार उष्णतेच्या लाटेनंतर आता विदर्भात 14 आणि 15 मार्च दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात वर्तवण्यात आला आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच विदर्भाला कडक उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली आहे. मात्र आता हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात एक द्रोनीका (अप्पर टफ वे) तयार झाला आहे. त्यामुळे विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. पावसासोबतच ताशी 40 ते 50 किमी वेगानं वारे देखील वाहण्याची शक्यता आहे, अशी माहित नागपूर हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी दिली आहे.
अमरावतीत पावसाचा इशारा
अमरावतीमध्ये आजही प्रचंड उष्णता आहे. अमरावतीमध्ये तापमान 40 सेल्सिअस अंशावर पोहोचलं आहे. दरम्यान पुढील दोन ते तीन दिवसांत अमरावती जिल्ह्यामध्ये पवासाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
चद्रपुरात उष्णतेचा कडाका
दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली आहे, चद्रपूर जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअसवर पोहचलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेत मोठी वाढ झाल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. यामुळे दुपारी चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते निर्मनुष्य होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आव्हान जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
अकोल्यात उष्णतेची लाट
अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, तापमानाने पुन्हा एकदा चाळीशी पार केली आहे. काल अकोल्यातील कमाल तापमान 41 अंश सेल्सियसवर पोहोचले होते. आणि आजही उन्हाचा कडाका कायम असल्यामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यांवर अक्षरशः शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान हवामान खात्याने पुढील तीन ते चार दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, तसेच उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
बुलढाण्यात वाढत्या उष्णतेचा जनावरांना फटका
दरम्यान बुलढाण्यामध्ये देखील उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या तापमानात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर, तसेच दूध उत्पादनावर होत आहे. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात गुरांच्या व्यवस्थापनात योग्य बदल करून, त्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन स्थानिक कृषी विज्ञान केंद्रातील पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. मार्च महिन्यातच जिल्ह्यातील तापमान 39 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे.
कोकणात विचित्र हवामान
सध्या कोकणात विचित्र हवामान पहायला मिळत आहे. सकाळी दाट धुक्याची चादर, तर दुपारनंतर उन्हाचे चटके बसू लागले आहेत. गेल्या चार दिवसांपासून कोकणात ठीक ठिकाणी दाट धुके पडत असल्याचे पहायला मिळत आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वत्र धुके दिसून येत आहेत, त्यानंतर मात्र उन्हाचा पारा वाढत असल्याचं चित्र आहे.
मराठवाड्यात पावसाचा इशारा
दरम्यान दुसरीकडे मराठवाड्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार आहे, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
