इम्तियाज जलील यांचे गंभीर आरोप, थेट म्हटले, कायदा सर्वांसाठी समान असेल तर..
निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली. मध्यरात्री इम्तियाज जलील यांनी समर्थकांशी संवाद साधला. यावेळी इम्तियाज जलील यांनी काही गंभीर आरोप केले.

नाशिकमधील धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला राहण्यासाठी मदत केल्या प्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर मोठी कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने ही मोठी कारवाई करत मतीन पटेल याच्या घरावर बुलडोझर चालवले. पहाटेपासूनच ही कारवाई करण्यात आली. यावेळी मतीन पटेल याच्या कुटुंबियांनी महापालिका अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी कुटुंबिय हार घेऊन उभे होते. महापालिका अधिकाऱ्यांनी घरावर नोटीस लावली होती. मात्र, या नोटीसला काहीच उत्तर देण्यात आले नाही. अखेर शेवटी मतीन पटेल यांचे घर जमिनोदस्त करण्यात आले. यादरम्यान इम्तियाज जलील यांनी नारेगाव येथे मध्यरात्री भेट देत नागरिकांना संयम राखण्याचे आवाहन केले. मतीन पटेल यांच्या घरावर मनपाकडून अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली.
निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणानंतर ही कारवाई करण्यात आली. मध्यरात्री इम्तियाज जलील यांनी समर्थकांशी संवाद साधत साधला. इम्तियाज जलील यांनी समर्थकांना म्हटले की, मी आज शेवटच्या आशेने येथे आलो आहे. पुन्हा येईल तेव्हा मतीन पटेल यांना सोबत घेऊन येईल. मतीन पटेल यांच्या कुटुंबाने महापालिका पथकाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी त्यांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, आज घर पाडले जात आहे, पण पुन्हा घर उभे करू… न्यायालयाने सात दिवसांचा वेळ दिला असेल तर मनपाने 24 तासांचीही प्रतीक्षा का केली नाही?” असा सवाल देखील त्यांनी यादरम्यान उपस्थित केला. तसेच, एमआयएमला कमजोर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही त्यांनी यावेळी गंभीर आरोप केला.
पुढे बोलताना इम्तियाज जलील यांनी म्हटले की, पोलीस, सत्ता आणि प्रशासन त्यांच्याकडे आहे. आम्ही न्यायालयात जातो आणि न्यायालयाच्या निर्णयालाही मान दिला जात नसेल तर आम्ही कुठे जायचे?” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. इम्तियाज जलील यांनी म्हटले की, मतीन माझा भरोशाचा माणूस आहे. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कायदा सर्वांसाठी समान असेल तर त्याची अंमलबजावणीही समान झाली पाहिजे.
