Girish Mahajan: गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल… उद्धव ठाकरे यांच्या शंकेनंतर गिरीश महाजन यांनी दिले असे उत्तर
Girish Mahajan on Uddhav Thackeray: छत्रपती संभाजीनगर येथे गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल उद्धव ठाकरे यांनी शंका उपस्थित करत एकच खळबळ उडवून दिली. त्यावर आता भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. महाजन यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

किशोर पाटील, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि तुमसे ना हो पाएगे या कार्यक्रमानिमित्त उद्धव ठाकरे 17 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली. त्यांनी मुंडे यांच्या मृत्यूबद्दल काय बोलले जात आहे, त्यावर भाष्य केले. त्यानंतर भाजपच्या गोटातून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले. आता मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना मोठे वक्तव्य केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूविषयी उद्धव ठाकरे यांनी शंका असल्याचे सूतोवाच केले. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. एखाद्या विषयावरचे लक्ष दुसरीकडे वळवायचं असेल तर अशा पद्धतीचे भडक वक्तव्य केले जातात. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल कोणालाही शंका नाहीये अगदी त्यांच्या कुटुंबातले पंकजाताई असतील किंवा कोणी असेल. कुणालाही शंका नाहीये. असं असतानाही असं मध्येच वाईट स्टेटमेंट करायचं मला वाटतं हे योग्य नाही. टीव्हीवर सध्याचे चालला आहे त्यावरचं लक्ष विचलित करण्याकरता मला वाटतं हे अशा पद्धतीचा वक्तव्य केलं गेलं असावं, असे महाजन म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार
उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आणि दुष्काळ जाहीर करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगर येथे केली. त्यावरून महाजन यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांना म्हणा तुम्ही सरकारमध्ये होते तेव्हा काय केलं. कोरोनाचा एवढा मोठा संकट आलं तेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडले नाही. तुम्ही काय आम्हाला सांगता आहे, असा पलटवार महाजन यांनी केला. शेतकर्यांना जेवढी मदत मागच्या तेरा वर्षांमध्ये आमच्या सरकारने केली तेवढे कोणीच केली नाही. मग ते शिंदे साहेब असो की देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असो. वीज बिल माफ केलं. साडेसात हॉर्स पावरचे सोलर पंप दिले. अगदी हे शेतकर्याला स्वप्न सारखं आहे, कुणालाही वाटत नव्हतं असं काही होईल, असा दावा महाजन यांनी केला.
कर्ज माफ केलं. असं सर्वच क्षेत्रांमध्ये आम्ही शेतकर्यांना मदत करतो आहोत मात्र तुम्ही काय केलं. आता मागणीचे पत्र येत आहेत मात्र आपल्या काळात आपण काय बोंब पाडली, हे तपासून बघितलं पाहिजे. मागायला तर तुम्ही सर्वच मागाल. पण सरकार शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे महाजन म्हणाले. शरद पवार यांच्या पत्रावर चांगलं आहे, त्यांच्या पत्राचं स्वागत आहे, असे महाजन म्हणाले.
मंत्री गिरीश महाजन यांचे बाप्पाला साकडे
अन्नधान्य पिकलं नाही तर आपल्याला धान्य कुठूनही आणता येईल. आपल्याकडे धान्याचे गोदाम भरलेले आहेत. मात्र पाणी कुठून आणायचं हा सर्वात मोठा प्रश्न आता सर्वांसमोर आहे. गणरायाला हीच विनंती आहे की अजूनही वेळ आहे चांगला पाऊस परतीचा पडू दे, असे साकडे महाजन यांनी घातले. दिशा सालियन यांचे वडील मातोश्रीवर जाणार असल्याबाबत आपल्याला काही माहिती नाही. त्यांनी त्यांचं कायदेशीर म्हणणं मांडलेले असल्याचे महाजन म्हणाले.
राहुल गांधी यांच्यावर टीका
राहुल गांधी यांच्या बद्दल काय बोलणार राहुल गांधी शेवटी राहुल गांधी आहेत. ते शेवटी काही बोलू शकतात. आता त्यांना कुठलाही जनाधार राहिलेला नाही. देशामध्ये कुठेही आता काँग्रेसचे काही राहिलेलं नाही. राहुल गांधी यांच्या बोलण्यामुळे मला वाटतं देशातलं कुठलाच राज्य यांच्या हातात राहिलेलं नाही. एखादा राज्य असेल तर त्या ठिकाणी देखील निवडणुका लागल्या तर ते देखील जाईल. त्यामुळे राहुल गांधी यांना मुभा आहे ते काहीही बोलू शकतात. त्यांच्या मागे लोक राहिलेले नाही त्यांच्या मागे जनमत राहिलेलं नाही. लोकांना माहिती आहे भाजपा शिवाय पर्याय नाही आपल्या देशाला नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. हे सर्व देशाला आणि जगाला माहिती आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला फार काही अर्थ नाही, अशी टीका राहुल गांधी यांच्यावर महाजन यांनी केली.