
रात्रीच्यावेळी प्रवासाला निघाल्यानंतर काळजी घेणं खूप आवश्यक असतं. खासकरुन ड्रायव्हरची झोप पूर्ण झालीय ना? त्याला डुलकी येत नाहीय ना? त्याला कुठला त्रास होत नाहीय ना? हे तपासून घ्यावं लागतं. कारण गाडीच्या ड्रायव्हरवर इतरांचं आयुष्य अवलंबून असतं. अशाच एक भीषण अपघातात काहींनी आपला जीव गमावला. जळगावच्या पाचोर्याजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.
मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात राहणारे तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील आसनखेडा येथे कार्यक्रमासाठी गेले होते. परत येत असताना पाचोरा–जळगाव रस्त्यावरील एका हॉटेलजवळ अचानक कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.
दोन ते तीन वेळा पलटी
कार रस्त्याच्या कडेला जोरात धडकून दोन ते तीन वेळा पलटी झाली. या अपघातात श्रीरंग सुरेश पाटील आणि प्रसन्न रवींद्र निमजे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. इतर पाच जण जखमी झाले आहेत. काहींवर पाचोरा येथे उपचार सुरू आहेत.
पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद
गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगावला हलवण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की इनोव्हा कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून महावितरणचा पोलही कोसळला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.