
राज्यातील 29 महानगर पालिकांच्या निवडणुकीचा निकाल यायला सुरु झाली आहे. संपूर्ण राज्यात भाजपचे वर्चस्व पहायला मिळत आहे. यंदा पहिल्यांदाच इचलकरंजी आणि जालना या दोन नवीन महापालिकेसाठी मतदान पार पडले होते. या महापालिकांचाही निकाल आता समोर येताना पहायला मिळत आहे. या दोन्ही ठिकाणी कोणत्या पक्षाचे किती उमेदवार आघाडीवर आहेत याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
इचलकरंजी महानगर पालिकेत भाजप एकहाती सत्ता मिळवत असल्याचे आकडे समोर आले आहेत. 65 जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपच्या 43 उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. तर शिवसेनेचे केवळ 2 उमेदवार आघाडीवर आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार आघाडीवर आहे. तर इतर आणि अपक्ष असे 16 उमेदवारही आघाडीवर आहेत. त्यामुळे या महापालिकेत पहिलाच महापौर हा भाजपचा असणार आहे.
जालना महानगर पालिका निवडणुकीचेही कल समोर आले आहेत. जालन्यातील 65 जागांसाठी मतदान पार पडले होते. या महापालिकेत आतापर्यंत भाजपने 26 जागांवर आघाडी घेतली आहे, तर शिवसेनेने 4 जागांवर आघाडी घेतली आहे. जालन्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. महाविकास आघाडीचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. तसेच एमआयएमचे 2 उमेदवार आघाडीवर आहेत, तर एक अपक्ष उमेदवारही आघाडीवर आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये जालन्यात आघाडी घेतली आहे.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीची सरशी पहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेने 130 जागांवर आघाडी घेतली आहे. यातील काही उमेदवार विजयी झाले आहेत. तर ठाकरे बंधू हे 71 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेत भाजपचा महापौर बसण्याची शक्यता आहे. तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. कल्याण डोंबिवलीतही भाजप आणि शिवसेना आघाडीवर आहे. तर नाशिकमध्येही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यातील बहुतांशी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकताना दिसणार आहे.