Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी तरुणाचं टोकांचं पाऊल, लातूरसह मराठवाड्यात रास्ता रोको, मनोज जरांगे यांच्या एका फोन नंतर काय घडलं?
Manoj Jarange Mumbai Morcha: मराठा आरक्षणावरून मराठवाड्यात वातावरण तापले आहे. त्यातच काल लातूरमध्ये एका तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यानंतर ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी एक फोन केल्यानंतर काय घडलं?

मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांवरून मराठवाड्यात वातावरण तापलं आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईला धडक देण्याची तयारी करत आहेत. दरम्यान लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यामधील सुमठाणा येथे एका तरुणाने विहिरीत उडी घेत जीवन संपवले. मराठा आरक्षणासाठी सुनील बिरादार या तरुणाने टोकाचे पाऊल टाकल्याचा दावा त्याच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर लातूरसह इतर ठिकाणी रास्तारोको करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी एक फोन केल्यानंतर काय घडलं?
प्रशासनाकडून लेखी आश्वासन
प्रशासनाच्या लेखी आश्वासना नंतर आणि मनोज जरंगे पाटील यांनी फोनवरून संवाद साधल्या नंतर लातूर जिल्ह्यातल्या येरोळमोड इथं सुरू असलेला रास्ता रोको रात्री उशिरा मागे घेण्यात आला आहे. जीवन संपवलेल्या सुनील बिरादार यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घ्या अशी मागणी आंदोलकांची होती. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या लेखी आश्वासना नंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला आहे. आज सुनील बिरादार यांच्यावर सुमठाणा या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मनोज जरांगेंचा आंदोलकांशी संवाद
लातूरमध्ये आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन केले. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी जरांगे पाटील यांनी फोनवरून आंदोलकांशी संवाद साधला. आपल्या भावाची हेळसांड करू नका नोकरी आणि आर्थिक मदत मिळवून देऊ असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला. तर कोणीही रास्ता रोको, टायर जाळणे असे प्रकार करू नका, असे आवाहन जरांगे पाटील यांनी सर्व आंदोलकांना केले आहे.
बीड तालुक्यातही रास्ता रोको
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ बीडच्या पेंडगावमध्ये धुळे-सोलापुर महामार्ग रोखत घोषणाबाजी करण्यात आली. बीड तालुक्यातील पेंडगावमध्ये रस्ता रोको सुरू आहे. जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी करत जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ रस्ता रोको सुरू करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेस हे आंदोलन सुरू झाले असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
मुंबईत जाण्यावर जरांगे ठाम
जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी रात्रभर मराठा बांधवांची गर्दी जमली आहे. मुंबईच्या आंदोलनाबाबत जरांगे पाटलांकडुन वारंवार मार्गदर्शन करत आहेत. मुंबईला जाण्याची तयारी सुरू, महिला मोठ्या संख्येने मुंबईला या असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा बारावा दिवस आहे. रात्रभर अंतरवालीत मराठा बांधवांची मोठी गर्दी होती तर महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
राजकीय सभांवर बहिष्काराचे अस्त्र
मनोज जरांगे पाटील यांनी 12 तारखेला अंतर वाली सराटीत या असे आव्हान केल्या नंतर हिंगोलीत सकल मराठा समाज बांधवांच्या स्वयंसेवकांची पत्रकार परिषद पार पडली.12 ताखरेला हिंगोली जिल्ह्यातून 50 ते 60 हजार मराठा समाज बांधव अंतरवाली कडे जातील, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या कालावधीत मराठा समाज बांधवांनी राजकीय सभा मेळावा यावर बहिष्कार घालावा.अस ही आव्हाण मराठा समाज बांधवांना स्वयंसेवकांनी केले आहे .