
अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या निधनापूर्वी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून याबाबत सकारात्मक विधाने करण्यात आली होती. आता अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा एकदा दोन्ही पक्ष विलीन होणार का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. शरद पवारांनीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत विधान केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील विलीनिकरणावर मोठं विधान केलं आहे. दोन्ही राष्ट्रवादी याआधीच एकत्र आल्या असत्या, याबाबत निवडणूक आयोगासोबत माझं बोलणं झालं होतं असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटले की, ‘मी, अजित पवार, शशिकांत शिंदे आणि इतर नेते एका बैठकीसाठी एकत्र आलो होतो. सुनील तटकरे हेही बैठकीला येणार होते, मात्र काही कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यावेळी आमची विलिनीकरणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी लवकरात लवकर हा निर्णय घेण्यास सर्वांची सहमती होती. दोन्ही पक्ष याआधीच विलीन झाले असते, मात्र निवडणूक आयोगाने नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या. त्या संपायच्या आधी महापालिकांच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्यास संधी मिळाली नाही.’
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘त्यावेळी निवडणूक आयोगातील एका व्यक्तीशी माझं बोलणं झालं होतं, विलिनीकरणासाठी आम्हाला 4 दिवसांचा वेळ द्या आणि त्यानंतर जिल्हा परिषद निवडणूक घोषित कर अशी मागणी आम्ही केली होती. पण तसं होऊ शकलं नाही, का झालं नाही ते माहिती नाही, त्याच्यावर बोलणंही योग्य नाही.’
जयंत पाटील यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर आपण दोन्ही पक्ष एकत्र करण्याची घोषणा करू असा निर्णय झाला होता. त्यानंतर शरद पवारांच्या निवास्थानी आम्ही पुन्हा भेटलो, त्यावेळी विलीनिकरणावर एकमत झालं. त्यावेळी 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी मतदान आहे आणि 7 तारखेला मतदान आहे, त्यामुळे 8 तारखेला याची घोषणा करू असं ठरलं होतं. पण मी 8-9 तारखेला उपलब्ध नव्हतो त्यामुळे 12 तारखेला याची घोषणा करू असं ठरलं होतं.’