केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी घडामोड; केतनच्या वडिलांचे थेट राष्ट्रपतींना पत्र, म्हणाले, ‘मुलगा-वडील दोन्ही गेले, आता…’
ketan agarwal news : केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची मोठी अपडेट हाती आली आहे. या प्रकरणात केतनच्या वडिलांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे.

देशभरात गाजत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. केतनची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरीवर कठोर कारवाई व्हावी, याची मागणी जोर धरू लागली आहे. राजा सोनम रघुवंशी प्रकरणाशी तुलना करत आरोपी सियाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. केतन अग्रवाल याच्या हत्येनंतर 20 दिवसांनी त्याच्या आजोबाचं निधन झालं. त्यामुळे अग्रवाल कुटुंब मोठ्या दु:खात आहे. याचदरम्यान केतनच्या वडिलांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहून न्यायाची मागणी केली आहे.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं. त्यांनी राष्ट्रपतींकडे मुलाला न्याय मिळवून देण्याची आर्त हाक मारली आहे. पत्र लिहिताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. कोणतीही राजकीय किंवा व्यावसायिक ओळख न वापरता, केवळ एक हतबल पिता म्हणून न्याय मागत असल्याचे म्हटले आहे.
विशाल अग्रवाल यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात एका अत्यंत दुर्दैवी घटनेचाही उल्लेख केलाय. केतनच्या निर्घृण हत्येच्या धक्क्यातून कुटुंब सावरत नाही, तोच अवघ्या २० दिवसांत विशाल अग्रवाल यांच्या वडिलांचेही निधन झालं. नातवाच्या मृत्यूचा धक्का आणि सततचा मानसिक तणाव सहन न झाल्यामुळे त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे, असं त्यांनी पत्रात नमूद केलंय. अवघ्या २० दिवसांत तरुण मुलगा आणि वृद्ध वडील या दोघांनाही गमावल्यामुळे संपूर्ण अग्रवाल कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय, असं त्यांनी पत्रात म्हटलंय.
पीडित वडिलांनी राष्ट्रपतींकडे या पत्राद्वारे काय मागणी केली?
केतन अग्रवाल प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी व्हावी. न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबामुळे कुटुंबाच्या वेदना आणखी वाढत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जावी. आरोपींना कठोर शिक्षा मिळावी. या अमानुष गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्या दोषींना कायद्यानुसार शक्य असलेली कठोर शिक्षा दिली जावी, जेणेकरून समाजात अशा प्रकारच्या घृणास्पद गुन्ह्यांची पुनरावृत्ती होणार नाही,अशी मागणी त्यांनी केली आहे.