Ketan Agarwal Murder Case : पळून जाऊन सियाशी लग्न का केलं नाही? केतनला मारलंच का? चेतनचं उत्तर ऐकून सर्वच हादरले…
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आले आहे. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनचा खून पळून जाण्याऐवजी का केला, याचा उलगडा झाला. समाजात कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी सियाने केतनला ठार मारण्याचा कट रचला, असे चेतनने पोलिसांना सांगितले. हे उत्तर ऐकून सर्वच हादरले असून, सामाजिक प्रतिष्ठेसाठी केलेल्या या गुन्ह्यामागील क्रूरता स्पष्ट झाली आहे.

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील एक एक गोष्टी समोर येत आहे. सर्वात आधी हा लव्ह ट्रायंगल असल्याचं उघड झालं. होणाऱ्या बायकोनेच केतनचा खून केल्याचं स्पष्ट झालं. तिच्या कटात तिचा बॉयफ्रेंड असल्याचंही उघड झालं. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दोघांपैकी केतनला कुणी धक्का मारला हे अद्याप स्पष्ट झालं नाही. पण जर सियाला केतनसोबत लग्नच करायचं नव्हतं तर सिया आणि चेतनने पळून जाऊन लग्न का केलं नाही? केतनला का मारलं? असा सवाल पोलिसांना पडला आहे. त्याचं उत्तर चेतन चौधरीने दिलं असून उत्तर ऐकून सर्वच हादरून गेले आहेत.
पोलिसांनी चेतन चौधरी आणि सिया गोयलची कसून चौकशी केली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांना तुम्ही पळून जाऊन लग्न का नाही केलं? असा सवाल केला. त्यावर चेतनने धक्कादायक उत्तर दिलं. सियाला लग्न मोडून पळायचं नव्हतं. तिला त्याचा विरोध होता. असं केल्याने समाजात कुटुंबाची नाचक्की होईल. बदनामी होईल. अपमान सहन करावा लागेल. त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वाचवण्यासाठीच तिने केतनला ठार मारण्याचा प्लान केला, असं चेतनने सांगितलं. चेतनचं हे उत्तर ऐकून सर्वच हादरून गेले आहेत.
15 दिवसात चार वेळा किल्ल्यावर…
केतनची बहीण संजना आणि कुटुंबाच्या चौकशीतून महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. फेब्रुवारीत साखरपुडा झाल्यानंतर सियाने वारंवार लोहगडावर जाण्यासाठी केतनकडे हट्ट धरला. सतत ती केतनवर दबाव टाकायची. केवळ 15 दिवसात चार वेळा ती केतनला लोहगड किल्ल्यावर घेऊन गेली होती.
कधी काय घडलं ?
31 मे – सिया पहिल्यांदा केतनला लोहगडावर घेऊन गेली.
4 जून – त्यानंतर दुसऱ्यांदा तिने केतनला लोहगडावर जाण्याचा आग्रह धरला. पण केतनच्या आईने नकार दिला.
14 जून – सिया केतनला लोहगडावर घेऊन गेली. तिथे तिने केतनला धक्का दिला. पण एका झाडाच्या फांदीला पकडल्याने केतनचा जीव वाचला. केतन वाचल्याचं पाहून सियाने साप आल्याचा बहाणआ करून त्याला घट्ट मिठी मारली. त्यामुळे केतनलाही साप आल्यामुळे सियाने आपल्याला धक्का दिला असं वाटलं.
18 जून – 19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता. त्यामुळे तिने 18 जून रोजी केतनला गडावर जाण्याचा हट्ट धरला. माझे काही मित्र गडावर मला सरप्राईज गिफ्ट देणार आहे, त्यामुळे आपण जाऊ असा आग्रह तिने धरला. केतन तयार नव्हता. पण तिने वाद घातला. त्यामुळे केतनला नाईलाजाने तिच्यासोबत जावं लागलं. तिथे आधीच चेतन आलेला होता आणि त्यांनी संगनमताने मिळून केतनचा काटा काढला.
