अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, पठ्ठ्याने एकहाती निवडणूक जिंकली, गड आला पण…

खेड पंचायत समितीच्या निवडणूक निकालाची सध्या सगळीकडेच चर्चा होत आहे. या निवडणुकीत ठाकरे गटाने दमदार कामगिरी केल आहे.

अख्ख्या राज्यात ठाकरेंच्या वाघाची चर्चा, पठ्ठ्याने एकहाती निवडणूक जिंकली, गड आला पण...
uddhav thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 09, 2026 | 8:08 PM

Khed Panchayat Samiti Election Result : गेल्या काही दिवसांपासून राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची धूम चालू होती. 7 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीसाठी मतदान झाले होते. तर आज म्हणजेच 9 फेब्रुवारी रोजी या निवडणुकीचा निकाल लागला. 12 जिल्हापरिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या पक्षानेही चांगली कामगिरी केली आहे. परंतु संपूर्ण जिल्हापरिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणूक निकालामध्ये राज्यात एका पंचायत समितीच्या निकालाची राज्यभरात चर्चा होत आहे. या पंचायत समितीवर ठाकरे गटाने विजयाची मशाल पेटवली आहे.

नेमकी का चर्चा होतेय?

राज्यभरात पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या निकालाची चर्चा होत आहे. या पंचायत समितीवर टाकरे गटाने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. येथे एकूण 16 जागांसाठी निवडणूक झाली होती. यापैकी तब्बल 12 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. खास बाब म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीतही ठाकरे गटाने एकूण पाच जागांवर बाजी मारली आहे.

गड आला पण सिंह गेला

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार बाबाजी काळे यांनी खेडची पंचायत समिती जिंकण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. ते खेड-आळंदी मतदारसंघाचे आमदार आहेत. काहीही झालं तरी पंचायत समिती हातातून जायला नको यासाठी त्यांचे प्रयत्न चालू होते. विशेष म्हणजे या निवडणुकीत त्यांची भगिनी राजश्री जैद यादेखील उभ्या होत्या. बाबाजी काळे यांच्या उमेदवारांनी पंचायत समितीवर विजय मिळवला आहे. परंतु त्यांच्या भगिनीचा मात्र पराभव झाला आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी स्थिती तेथे झाली आहे.

भाजपा, शिंदे गटाने जोर लावला पण…

खेड पंचायत समिती जिंकण्यासाठी तेथील भाजपा, शिंदे गटाने खूप जोर लावला होता. अनेक बड्या नेत्यांनी येथे सभा घेतल्या होत्या. तर दुसरीकडे खेड तालुक्यात कोणत्याही बड्या नेत्याची सभा झाली नव्हती. असे असूनही बाबाजी काळे यांनी एकहाती किल्ला लढवत ठाकरे गटाला विजय मिळवून दिला. खेडची पंचायत समिती जिंकल्यामुळे ठाकरे गटाने पुण्यात आपली पाळंमुळं रुजवायला सुरुवात केल्याचे म्हटले जात आहे.