Zilla Parishad Election Result : अजितदादांची ज्याच्यासाठी शेवटची सभा, त्या नेत्याचं काय झालं; पराभव की विजय?
अजित पवार यांनी त्यांची शेवटची सभा खेड तालुक्यात घेतली होती. या सभेत त्यांनी एका उमेदवाराची थेट घोषणा केली होती. त्या उमेदवाराचा विजय झाला की पराभव असे विचारले जात आहे.

Zilla Parishad Election Result : राज्यात जिल्हापरिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवर ताकद लावली होती. विशेष म्हणजे या निवडणुकीत राज्यातील बड्या नेत्यांनीही प्रचारसभा घेतल्या. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर सर्वोच्च नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मतदारांनी आपल्याच पक्षाला मत द्या, असे आवाहन केले होते. दरम्यान, या निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीतही भाजपा 50 पेक्षा जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे. असे असतानाच दिवंगत नेते अजित पवार यांच्या पक्षाने या निवडणुकीत काय कामगिरी केली? असे विचारले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी त्यांच्या शेवटच्या सभेत ज्या उमेदवाराची घोषणा केली होती, त्या उमेदवाराबाबतही मोठी माहिती समोर आली आहे.
ज्याची उमेदवारी जाहीर केली त्याचा विजय
पुण्याच्या खेड तालुक्यातील वराळे येथे अजित पवार यांची शेवटची सभा घेतली. या जाहीर सभेत त्यांनी त्यांनी जाहीर केलेल्या जिल्हा परिषद उमेदवाराचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शरद बुट्टे पाटील यांचे त्यांनी नाव जाहीर केले होते. त्यांचा ३९९ मतांनी विजय झाला आहे. हीच ती सभा होती जिथे अजित पवार यांनी “राजकारण लई वंगाळ असतं” अशी टिप्पणी करत कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला होता.
राष्ट्रवादीला खेड तालुक्यात मोठे यश
त्याच सभेत भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या शरद बुट्टे पाटील यांना अजितदादांनी थेट उमेदवारी जाहीर केली होती. आता त्याच उमेदवाराने विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसला खेड तालुक्यात मोठं यश मिळवून दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात कशी कमागिरी केली?
अजित पवार हे परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार करायला बारामतीत विमानाने जात होते. परंतु त्यांचा लँडिंगच्या वेळी अपघात झाला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीत कोणताही प्रचार केला नाही. कुठेही सभा घेतली नाही. दरम्यान, या निवडणुकीत एकूण 12 जिल्हापरिषदांपैकी दोन जिल्हापरिषदांवर अजितदादांच्या पक्षाने बाजी मारली आहे. तर एकूण 125 पंचायत समितींपैकी 25 पंचायत समित्यांवर अजित पवार यांच्या पक्षाची सत्ता आली आहे.
