महाराष्ट्रावर दुहेरी संकट, आता चिकन खाण्याचे वांदे? बर्ड फ्लूचं थैमान, तब्बल एवढ्या कोंबड्या मारल्या जाणार
महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लूचे गंभीर संकट आलं आहे, नंदुरबारमध्ये 1.4 लाख कोंबड्या नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झाली. यामुळे चिकन खाणाऱ्यांमध्ये चिंता वाढली असून पोल्ट्री उद्योगाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शासनाने तात्काळ उपाययोजना करत रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कडक पाऊले उचलली आहेत.

महाराष्ट्रात आधीच आस्मानी संकट सुरू असताना आता आणखी एक संकट घोंघावत आहे. आधीच कडक उन्हामुळे नागरिक होरपळून निघाले आहेत. अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. राज्यात आतापर्यंत उष्माघाताने 9 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. हे संकट असतानाच आता राज्यात दुसरं संकट धडकण्याची शक्यता आहे. राज्यात बर्ड फ्ल्यूने शिरकाव केला आहे. त्यामुळे एकच घबराट पसरली आहे. नंदूरबार जिल्ह्याच्या नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूने कहर केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोंबड्या मारल्या जाणार आहेत. बर्ड फ्ल्यू राज्यात इतर ठिकाणी फोफावला तर अनेकांचे चिकन खाण्याचेही वांदे होणार आहेत.
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने 1 लाख 40 हजार कोंबड्यांचे किलिंग केले जाणार आहे. तीन पोल्ट्री फार्मचे सॅम्पल इंदूरच्या प्रयोगशाळात पाठवले होते. ते सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाल्याने प्रशासनही खडबडून जागं झालं आहे. बर्ड फ्ल्यूचा शिरकाव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावलं उचलली आहेत. एक तालुकास्तरीय समिती तयार करण्यात आली असून, नवापूरच्या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्मचे आता सॅम्पल घेतले जाणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी दिली आहे.
एक किलोमीटरच्या परिसरात…
पॉझिटिव्ह आलेल्या पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या ठार केल्या जाणार आहेत. इतर कोंबड्यांना आजाराची लागन होऊ नये आणि नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या सहा पोल्ट्री फॉर्ममध्ये 1 लाख 40 हजार कोंबड्या आहेत. या सर्व कोंबड्या ठार मारल्या जाणार आहेत, अशी माहितीही मिताली सेठी यांनी दिली.
10 लाख कोंबड्या वाचवण्यासाठी…
नवापूरच्या परिसरात 10 लाख कोंबड्या आहेत. त्यामुळे या सर्व कोंबड्यांना आता धोका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बर्ड फ्ल्यूचा इतर ठिकाणी शिरकाव होऊ नये यासाठी तीन किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि पाच किलोमीटरच्या बफर झोन म्हणून मार्किंग करण्यात येणार आहे. नवापूरमध्ये बर्ड फ्ल्यूचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या पोल्ट्री फार्म संचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. ज्या पोल्ट्री फार्मचं नुकसान होणार आहे, त्यांची माहिती शासनाकडे पाठवून शासनाच्या नियमानुसार त्यांना मदत दिली जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
