Maharashtra Budget 2026 : बजेटमधून जनतेला काय मिळणार? फडणवीसांच्या 5 मोठ्या घोषणा
आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला, यावेळी त्यांनी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत, ज्यामध्ये शेतकरी आणि राज्यातील रस्ते विकासासाठीच्या काही महत्त्वाच्या घोषणांचा समावेश आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला, त्यामध्ये त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आगामी दोन वर्षांमध्ये महाराष्ट्रात नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे. त्यासोबतच महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत. आता शेत मजुरांचा सामावेश देखील गोपीनाथ मुंडे मंडळात करण्यात येणार असून, त्याचा मोठा फयदा या शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. याचबरोबर मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद योजनेची घोषणा देखील आजच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे.
दरम्यान ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चारही कृषी विद्यापीठात एआयची मदत घेतली जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे अॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. १ कोटी ३१ लाख फार्मर आयडी फेब्रुवारी पर्यंत झाले आहेत. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.
मुंबईकरांना काय मिळणार?
ऐरोली ते कटई नाका भाग तीनचे काम पूर्ण होत आहे. ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उन्नत मार्ग बनवणार. अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार, मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार. अटल सेतूला नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडण्यासाठी उलवे किनारी प्रकल्प पूर्ण करणार. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत, अशा काही महत्त्वाच्या घोषणा देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.
पर्यटन क्षेत्राचा विकास
निवडक ५० पर्यटन स्थळांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यासोबतच वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प नियोजित केला आहे. राज्यातील तिसरी चित्रनगरी नागपूर येथे होईल, चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य केले जाईल, ५ ज्योतिर्लिंगांसाठी पाच वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांकडे समन्वय सोपवले आहेत, त्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, अशी घोषणाही यावेळी फडणीस यांनी केली आहे.
ग्राम सडक योजना
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ अंतर्गत २३ हजार किमीचे रस्ते तसेच पुलांची कामे हाती घेतली जातील, अशी घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
गाव जोडणी योजना
तसेच १ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडण्यात येईल अशी मोठी घोषणाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
