महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकांचे बिगुल वाजणार, हालचाली वाढल्या, कधी होणार घोषणा? मोठी अपडेट समोर
महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात असून, ही निवडणूक बिनविरोध होणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

राज्यातील महापालिका, विधानसभा, लोकसभा या सर्व निवडणुका संपल्यानंतर आता राज्यातील राजकारण स्थिर स्थावर होताना दिसत आहे. त्यातच आता महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील दोन अत्यंत महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेली बारामती आणि भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेली राहुरी या दोन जागांवर ही निवडणूक होणार आहे.
पाच राज्यांच्या निवडणुकांसोबतच घोषणा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाकडून मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात या पोटनिवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाऊ शकते. येत्या काही दिवसात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळ या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे. या निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती या दोन जागांसाठी मतदानाची घोषणा केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार रिंगणात
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली असून सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार येथून निवडणूक लढवणार हे आता निश्चित झाले आहे. सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून ६ महिन्यांच्या आत विधिमंडळाचे सदस्य होणे अनिवार्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीने त्यांच्या उमेदवारीवर आधीच शिक्कामोर्तब केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हवाला देत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
कर्डिलेंच्या वारसदाराची प्रतीक्षा
तर अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये निधन झाले होते. या जागेवर भाजप घरातीलच एखाद्या सदस्याला उमेदवारी देत ही निवडणूक भावनिक मुद्द्यावर बिनविरोध लढवणार की नवीन चेहरा देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान या पोटनिवडणुका केवळ दोन जागांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नसून आगामी राजकीय समीकरणांची नांदी ठरणार आहेत. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या रूपाने घरातीलच वारसा पुढे नेला जात असताना, राहुरीमध्ये भाजप कोणती चाल खेळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्या महाविकासआघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांसाठी या जागा प्रतिष्ठेच्या आहेत. त्यामुळे या निवडणुकांना विरोधी पक्ष कसा प्रतिसाद देतात, यावर राज्याच्या राजकारणाची पुढील दिशा अवलंबून असणार आहे.
