एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार, दिवाळीपूर्वी अनेक मंत्र्यांना डच्चू, कोणाला लागणार लॉटरी?
महाराष्ट्राच्या राजकारणात दिवाळीपूर्वी मोठे फेरबदल होणार असून, निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तयार केलेल्या रिपोर्ट कार्डमुळे अनेक बड्या मंत्र्यांची पदे धोक्यात आली आहेत.

राज्यातील सर्व निवडणुका पार पडल्यानंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींचे वारे वाहू लागले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी आता आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दिवाळीपूर्वी राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात येणार आहे. यामुळे गेल्या अडीच वर्षात कोणतीही कामगिरी न केलेल्या मंत्र्यांचे पद धोक्यात आले आहे.
कामगिरी नसेल तर सुट्टी!
गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व मंत्र्यांच्या कामकाजाचा अहवाल (Report Card) तयार केले जात आहे. ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही किंवा ज्यांनी आपापल्या जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, अशा निष्क्रीय मंत्र्यांना मंत्रिमंडळातून लवकरच डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता आहे. या मंत्र्यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी नवीन संघटनात्मक जबाबदारी देऊन मंत्रिमंडळातून मुक्त केले जाऊ शकते, असे बोलले जात आहे.
नव्या चेहऱ्यांना संधी आणि पदोन्नती
या फेरबदलाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक नव्या आणि आक्रमक चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. सध्या राज्यमंत्री म्हणून काम करत असलेल्या काही अनुभवी मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून बढती मिळण्याचे संकेत आहेत. ज्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात पक्षाची पकड मजबूत ठेवली आहे या नेत्यांनाही पहिल्यांदाच मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते, अशीही माहिती समोर येत आहे.
का होणार हा बदल?
राज्यात येत्या दोन वर्षात आगामी विधानसभा, लोकसभा आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुका लक्षात घेता हे बदल करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत सत्तेचा फायदा पोहोचवण्यासाठी हा बदल अनिवार्य मानला जात आहे.
तसेच काही खात्यांमध्ये कामाचा वेग मंदावल्याची तक्रार येत आहे. या खात्यांमध्ये प्रशासकीय कामात सुधारणा करता यावी, यासाठी चांगल्या मंत्र्यांची गरज भासत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही मंत्र्यांच्या कामगिरीवर सध्या वरिष्ठ नाराज आहेत. तसेच, जे मंत्री नाहक वादात अडकले आहेत किंवा ज्यांच्याबद्दल स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्यांना घरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. या संभाव्य बदलांमुळे महायुतीमधील इच्छुक आमदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहे. तर विद्यमान मंत्र्यांमध्ये मात्र धाकधूक वाढली आहे. दिवाळीपूर्वी होणारा हा फेरबदल राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार असल्याचे बोललं जात आहे.
