Devendra Fadnavis : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एकदम रोखठोक उत्तर
"असे बहुतांश लोक होते, ज्यांचा कधीही संघाशी संबंध आला नाही. पूजनीय सरसंघचालकांनी फक्त मार्गदर्शन केलं नाही, तर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तरं दिली. त्यामुळे संघविरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार आहेत"

“छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने पुरंदर येथे जो विमानतळ होणार आहे, त्याच्या भूमी अधिग्रहणाला मान्यता दिली आहे. निधी उभारण्याकरता मान्यता दिलेली आहे. या संदर्भातली प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे. 96 टक्के लोकांनी मान्यता दिलेली आहे. लवकर जमीन अधिग्रहण केलं जाईल. साधारणापणे 1 जूनपर्यंत हे भूमिअधिग्रहण करावं असा आमचा प्रयत्न आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “एमएमआरडीएला अटल सेतूच्या जवळ प्लानिंग ऑथोरिटी म्हणून जी काही जागा आपण दिलेली आहे. त्या ठिकाणी सिडको आणि एमआयडीसीचे नियम लागू करुन त्यांना जमीन अधिग्रहण करता येईल अशी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे तिसऱ्या मुंबईची आपली जी संकल्पना आहे, त्या संकल्पनेला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल, वेगाने काम करता येईल” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
“आज जलसंपदा विभागाचा महत्वाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या ठिकाणी 40 प्रकल्प आणि 100 कनॉल 15 हजार कोटी रुपये नाबार्डच्या माध्यमातून दीर्घ मुदतीचं कर्ज घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. जे प्रकल्प घेतले आहेत, ते पुढच्या एक-दोन वर्षात पूर्ण होऊ शकतात. अंतिम टप्प्याचं काम बाकी आहे. हे जे काही प्रकल्प पूर्ण करणार आहोत, त्यामुळे साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. एकूण आठ लाख एकर जमीन ओलिताखाली येईल अशा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. सगळ्या रीजनला याचा फायदा होईल. सगळे अपूर्ण प्रकल्प यात घेतले आहेत” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
रोज उगाच पतंग कशाला उडवायचे
“आज सुनेत्राताई पवार यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती. दुखवटा असल्याकारणाने आम्ही फक्त शब्दसुमनाने त्यांचं स्वागत केलं. त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगली वाटचाल करेल. कालच्या निवडणुकीत त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिला” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, “विलिनीकरणाचा विषय हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. मी त्यात बोलणं योग्य राहणार नाही. जेव्हा वेळ येईल. ते अधिकृतरित्या सांगितल, त्यांच्यात काही ठरलं तर मी प्रतिक्रिया देईल. रोज उगाच पतंग कशाला उडवायचे”
म्हणून त्यांना वाईट वाटतय
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर संघचालक मोहन भागवत यांच्या कार्यक्रमावर राज ठाकरे यांनी टीका केली. त्यावर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिलं. “ज्या लोकांना निमंत्रण मिळालं नाही म्हणून त्यांना वाईट वाटतय. म्हणून ज्यांना निमंत्रण मिळालं त्यांच्यावर ते टीक करतायत. संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली. संघासंदर्भात वाद, अपवाद किंवा स्पष्ट माहिती मिळावी. लोकांच्या मनातले प्रश्न दूर व्हावेत यासाठी समाजातल्या विविध क्षेत्रातले, विविध उद्योगातल्या लोकांना बोलावलेलं”
