BMC Thane Election 2025 Date : मुंबई, ठाणे पालिका निवडणूक कधी होणार? निवडणूक आयोगाने सस्पेन्स संपवला; आता…
मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे. त्यामुळे आता या दोन्ही शहरांत कोणाची ताकद जास्त हे या निवडणुकीच्या माध्यमातून समजणार आहे.

BMC Thane Corporation Election Schedule: गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची वाट पाहिली जात होती. या निवडणुकीत मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रमाकडे तर समस्त राज्याचे लक्ष लागले होते. सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र निवडणूक आयोगाने मुंबई, ठाणे पालिकेच्या निवडणूक कार्यक्रमाबद्दल काहीही सांगितलेले नाही. असे असले तरी ठाणे, मुंबई पालिकेची निवडणूक कधी होणार, याबाबत मात्र माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोगाने नेमकी काय घोषणा केली आहे?
निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत मुंबई, ठाण्याच्या महापालिका निवडणुकीसंदर्भात सूचक विधान केले आहे. यावेळी आम्ही फक्त नगरपंचायत आणि नागरपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा करणार आहोत, असे निवडणूक आयोगाने सांगितले. या घोषणेनुसार 2 डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक होणार आहे. तर या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबर रोजी लागेल. तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 31 जानेवारीच्या अगोदर राज्यातील सर्व महापालिकांसाठी निवडणूक घेतली जाईल, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. यात मुंबई, ठाणे महापालिकेचाही समावेश असेल. म्हणजेच 31 जानेवारीच्या अगोदर मुंबई आणि ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे.
मुंबई, ठाण्याची निवडणूक का महत्त्वाची?
मुंबई महानगरपालिकेवर आतापर्यंत शिवसेनेची एकहाती सत्ता राहिलेली आहे. शिवसेनेचा हा गड भेदण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून भाजपा प्रयत्न करत आहे. शिवसेना पक्षाची दोन शकलं झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची ताकद काहीश कमी झालेली आहे. त्यामुळे आता भाजपा शिंदे यांच्या शिवसेनेला सोबत घेऊन मुंबई महापालिकेचा गड काबीज करू पाहते आहे. तर दुसरीकडे काहीही झालं तरी आम्हीच मुंबईवर भगवा फडकवणार असा ठाकरे गटाचा दावा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई जिंकता येणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. सोबतच ठाकरेंची मुंबईत किती ताकद राहिलेली आहे, हेही याच महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दिसेल. त्यामुळेच मुंबई पालिकेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
ठाण्याच्या निवडणुकीकडेही राज्याचे लक्ष
मुंबई महानगरपालिकेप्रमाणेच ठाण्याची पालिका निवडणुकही संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय आहे. कारण ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. शिंदे यांच्या या बालेकिल्ल्यात आपली ताकद वाढवण्याचा भाजपाकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे. दुसरीकडे ठाकरे यांचा पक्षही शिंदे यांच्या ठाण्यातील ताकदीला आव्हान देत आलेला आहे. त्यामुळे ठाणे महापालिका जिंकून शिंदे यांना धक्का देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केला जात आहे. त्यासाठी ठाकरेंनी पूर्ण ताकद लावलेली आहे. तर दुसरीकडे ठाण्याचा किंग मीच आहे, हे सिद्ध करण्याचे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यापुढे असणार आहे. त्यामुळेच मुंबई महापालिकेप्रमाणेच ठाण्याच्या पालिका निवडणुकीतही नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
