Maharashtra News LIVE : पेट्रोल आणि डिझेल काही जिल्ह्यांमध्ये तुटवडा
Maharashtra News LIVE : शिंदे गटातील अस्वस्थता पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय वर्तुळात नव्या ‘ऑपरेशन’ची जोरदार चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि ‘नव्या ऑपरेशन’ च्या चर्चांना उधाण आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बीड येथेच कार्यरत एका न्यायाधीशांचा फोटो व नाव वापरून व्हाट्सअप वर काही जणांना मेसेज पाठवण्यात आले. यामध्ये पैशांची मागणी देखील करण्यात आली होती. परंतु हा क्रमांक 11 अंकी असल्याने संबंधितांना संशय आला त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. यानंतर बीडच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
-
भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी संशयिताच्या घरातील साहित्य जाळल्याची घटना
जळगावात तानाजी मालुसरेनगरात भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी संशयिताच्या घरातील साहित्य जाळल्याची घटना. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिसांनी राजू काळे व सचिन कोळी या
दोघांना अटक केली आहे. अटकेतील राजू काळे व सचिन कोळी या दोघा आरोपींची घटनास्थळ परिसरातून शनी पेठ पोलिसांनी धिंड काढली. -
-
जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मध्यरात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी
जालना जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये काल सायंकाळी आणि मध्यरात्रीच्या सुमारास मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा दिलाय.अचानक सुरू झालेल्या वादळी वाऱ्याच्या जोरदार पावसामुळे बदनापूर तालुक्यातील आंबा पिकाला मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणात आंब्याची पडझड झाली.त्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्याच मोठ नुकसान झाल असून शासनाने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे, दरम्यान काल अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकरी बांधवांची मोठी दाणादाण उडाली.
-
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल तुटवडा बघायला मिळत आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. परभणी, बीड, नांदेड या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा..
-
जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेत एकाचा उष्माघाताने तर तिघांचा उष्माघात सदृश्य लक्षणांनी मृत्यू
जळगावातील चिंचोली येथील 57 वर्षीय सेंट्रिंग कामगार केशरलाल दौलत पाटील यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नोंद. उन्हात काम करताना अचानक चक्कर येऊन पडले, रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी मयत घोषित केले. जिल्ह्यातील इतर घटनेत तीन जणांचा उलटी चक्कर यासह इतर उष्माघात सदृश्य लक्षणांनी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ३५ वर्षीय प्रवीण दत्तु मिस्तरी , ३६ वर्षीय श्रीकांत रमेश कोळी व ४० वर्षीय नंदू किशोर पाटील अशी मयत तिघांची नावे आहेत.
-
-
कांद्याचे घसरलेले दर आणि इंधनाच्या दरवाढविरोधात आज सोलापुरात काँग्रेसचं आंदोलन
कांद्याचे घसरलेले दर आणि इंधनाच्या दरवाढविरोधात आज सोलापुरात काँग्रेसचं आंदोलन आहे. आंदोलनाच्या आधी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कायदेशीर आणि सनदशीर मार्गाचा वापर करून आंदोलन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस पोलिसांनी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख तिरुपती परकीपंडला यांना बजावली आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात काही वेळात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर रास्ता रोको केला जाणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मार्केट यार्डजवळ मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
-
नाशिक – अकरावी प्रवेशाची आज अंतिम मुदत; आतापर्यंत ४९ हजार अर्ज दाखल
नाशिक – अकरावी प्रवेशाची आज अंतिम मुदत असून आतापर्यंत ४९ हजार अर्ज दाखल झाले आहेत. सर्वाधिक पसंती विज्ञान शाखेला तर वाणिज्यचे केवळ ६८९८ अर्ज आहेत. नाशिक जिल्ह्यातील अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) पहिल्या फेरीसाठी अर्ज करण्याला २६ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून आज ती संपुष्टात येणार आहे. प्रवेशाची मुदत संपल्यानंतर आता केंद्रीय प्रवेश नियंत्रण समिती डेटा स्क्रूटनी आणि प्रोसेसिंगची कामे करणार आहे. त्यानंतर २९ मे रोजी सकाळी ११:०० वाजता पहिली गुणवत्ता यादी आणि कॉलेज अलॉटमेंट जाहीर केले जाणार आहेत.
-
चांदवड इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा
नाशिक- चांदवड इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कांदा उत्पादक शेतकरी क्रांती महामोर्चा काढणार आहेत. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नऊ वाजता मुंबई-आग्रा महामार्गावर क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. तीन हजार रुपये दराने शासकीय कांद्याची खरेदी करा, विक्री झालेल्या कांद्याला पंधराशे रुपये अनुदान द्या, या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत. या क्रांती महामोर्चात शिवसेनेचे अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यासह खासदार भास्कर भगरे, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, शोभाताई बच्छाव उपस्थित राहणार आहेत.
-
गिरीश महाजनांच्या पेट्रोल-डिझेलच्या काळाबाजारासंदर्भातील वक्तव्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर
भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पेट्रोल डिझेलच्या काळाबाजार संदर्भातल्या वक्तव्यानंतर जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. जळगाव जिल्ह्यात पेट्रोल डिझेलच्या काळाबाजारासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडून पोलीस विभागाला कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काळाबाजार होत असेल तर नागरिकांनी संपर्क तसेच तक्रार करावी, असं जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे. पेट्रोल डिझेलचा काळाबाजार तसंच साठा केल्याचं आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची जिल्हाधिकारी यांची माहिती आहे.
-
अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरातील न्यू सिरवी बंधू मिठाईवाल्याची कामगाराकडूनच पोलखोल
अंबरनाथच्या ग्रीन सिटी परिसरातील न्यू सिरवी बंधू मिठाईवाल्याची कामगाराकडूनच पोलखोल करण्यात आली आहे. मिठाईवाल्याकडून तारीख संपलेला माल विकला जात असल्याचा कामगाराचा दावा आहे. समोसे २ दिवस फ्रीजमध्ये ठेवून विकले जात असल्याचाही आरोप कामगाराने केला. तर घरगुती गॅस सिलेंडर वापरला जात असल्याचं व्हिडिओत समोर आलं.
-
दिपाली सय्यद यांची चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या वादात उडी
मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ निवडणुकीच्या वादात उडी घेतली आहे. महामंडळाच्या निवडणुकीबाबत कोर्टाचा निकाल 10 जूनला असताना 3400 सभासदांना ग्राह्य धरून निवडणूक जाहीर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 30 हजार सभासदांना त्यांच्या हक्काचा मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवलं, मग सभासदांनी भरलेल्या पैशांचं काय झालं, असा सवाल दिपाली सय्यद यांनी केला.
-
अशोक खरातनंतर आता नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल
भोंदू अशोक खरातनंतर आता नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अघोरी पूजा, दैवी तोडगे आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. भोंदू कमलेश अधिकारीविरोधात इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूरच्या दोन भावांना मृत्यूयोगाची भीती दाखवून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. उज्जैनमध्ये स्मशानभूमीत अघोरी पूजा, पशूंचा बळी आणि दैवी उपचारांच्या नावाखाली शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मठ बांधण्याच्या बहाण्याने पीडितांची दोन एकर जमीन परस्पर नावावर करून घेतल्याचाही गंभीर आरोप त्याच्यावर आहे. अंनिसच्या प्रयत्नांनंतर गुन्हा दाखल झाला असून इंदीरानगर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
-
नाशिक – एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला जाणार
नाशिक – एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा मोबाईल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवला जाणार आहे. मतीन पटेलच्या चौकशीत पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला होता. मोबाईलच्या माध्यमातून निदा खान संबंधित कनेक्शन शोधले जाणार आहेत. निदा खानसोबत फोनवरून संवाद झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. फोनच्या माध्यमातून कॉल डिटेल्ससह मेसेज चॅटिंग तपासले जाणार आहेत. फोनमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे मतीन पटेलची चौकशी केली जाणार आहे.
-
एकनाथ शिंदेंनी दिल्लीत घेतली अमित शाह यांची भेट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांची दिल्लीत भेट झाली आहे. या भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि ‘नव्या ऑपरेशन’च्या चर्चांना उधाण आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटातील नेत्यांशी संपर्क सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. काही माजी मंत्री आणि आमदारांमध्ये अस्वस्थतेचे संकेत आहेत. शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये नाराजी वाढल्याचीही चर्चा आहे. दिल्ली दौऱ्यात राजकीय समीकरणांवर महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत उकाडा कायम असून तापमानाचा पारा ३४ ते ३५ अंशांवर नोंदवला जात आहे. मात्र मागील काही दिवसांपासून रात्री उष्णतेचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. किमान तापमानातही मागील दोन दिवसांपासून सरासरी तापमानाहून वाढ नोंदवली जात आहे. सोमवारीही मुंबईत उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद झाली. तसंच मुंबईसह पालघर, ठाणे इथं बुधवारपर्यंत हीच स्थिती राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात एकीकडे मान्सूनपूर्व घडामोडींना वेग आला असताना दुसरीकडे विदर्भात तीव्र उष्णतेची लाटेसदृश स्थिती कायम आहे. त्याचबरोबर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची नोंद होत असून अचानक वातावरणात बदल होऊन बरसणाऱ्या पावसामुळे नागरिकांना उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळत आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.