Maharashtra News LIVE : नवी मुंबईत पावसाचा हाहाकार! मोठी वाहतूककोंडी
Maharashtra News LIVE Updates : आज कोकण किनारपट्टीवरील अनेक भागांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये साचले पाणी
मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील एपीएमसी (भाजीपाला बाजार) च्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पाणी साचले आहे. प्रवेशद्वाराबाहेर पाणी साचल्यामुळे बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना मोठ्या अडचणी येत असून, अनेकांना गुडघ्यापर्यंतच्या पाण्यातून चालावे लागत आहे.मेफ्को मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरही पाणी साचले आहे.
-
जळगाव जिल्ह्यात १०९ गावांत पाणीटंचाई; ३२ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा
१०९ गावात ३३ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू, ७७ खासगी विहिरींचे अधिग्रहण. जून महिना संपला तरी पावसाची मोठी तूट असल्याने अनेक गावांमधील सार्वजनिक पाणीपुरवठ्याचे स्रोत कोरडेठाक. काही तालुक्यांमध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे, पुरेसा पाऊस नसल्याने पाण्याची चिंता वाढवली. अमळनेर आणि जामनेर तालुक्यात प्रत्येकी बारा गावांमध्ये तर पारोळा तालुक्यात दोन भुसावळ तालुक्यात एका गावामध्ये पाणीटंचाई
-
-
भाविकांच्या ट्रॅक्टरला मालवाहू आयशरची धडक, एकाचा मृत्यू, 15 जण जखमी
पंढरपूरकडे जाणाऱ्या नातेवाईकांना सोडून घरी परतणाऱ्या भाविकांच्या ट्रॅक्टरला मध्यरात्री मालवाहू आयशरची जोरदार धडक; ट्रॅक्टरचे दोन तुकडे अपघातात एकाचा मृत्यू, दोन महिलांसह १५ जण जखमी. जखमींवर चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू
-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणात 26 टक्के पाणीसाठा
आज १.४६८ MLD पाणी धरणातून मुंबईसाठी सोडण्यात आले. अजूनही तालुक्यात मुबलक पावसाची प्रतीक्षा. तालुक्यात आतापर्यंत पावसाची नोंद 320 मी मी पावसाची नोंद. पावसाच्या माहेरघरिच पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र
-
नवी मुंबईत पावसामुळे हाहाकार, मोठी वाहतूककोंडी
सततच्या पावसामुळे जुईनगर स्टेशनजवळ मुंबईकडे जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पाण्याने भरलेल्या रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आणि अंदाजे २-३ किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली.
-
-
अक्कलकोट तालुक्यात पारंपरिक कारहुनवी सण उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा
बादोला बु. येथे कारहुनवीनिमित्ताने बैलाची मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली. बैलांना रंगीबेरंग, घंटा, फुलांच्या माळा, आकर्षक अलंकारांनी सजवले तर बैलांच्या शिंगांना रंग देऊन पारंपरिक रूप दिले जाते. शेतकऱ्याकडून पिकांच्या समृद्धीसाठी आणि चांगल्या पावसासाठी प्रार्थना केली जाते. कारहुनवी निमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणीहून नागरिक एकत्रित येऊन सण साजरा करतात..
-
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणात 26 टक्के पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणात 26 टक्के पाणीसाठा आहे. आज धरणातून १.४६८ MLD पाणी मुंबईसाठी सोडण्यात आलं आहे. अजूनही मुबलक पावसाची प्रतीक्षा असून तालुक्यात आतापर्यंत 320 मीमी पावसाची नोंद झाली आहे.
-
बोरिवलीत बनावट FDA अधिकारी अटकेत
मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी दोन बनावट FDA अधिकाऱ्यांना अटक केली आहे. विजय जाधव आणि स्वाती तुळसकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे स्वतःला FDA चे अधिकारी सांगून फॉर्च्युनर कारमधून एका हॉटेलमध्ये पोहोचले. त्यांनी हॉटेलची कागदपत्रे आणि इतर गोष्टींची तपासणी केल्यानंतर पैशांची मागणी केली. हॉटेल मालकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनी बनावट आयडी कार्ड तयार करून स्वतःला FDA अधिकारी असल्याचे सांगत असल्याचे उघड झाले.
-
पहाटेपासून कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची पुन्हा हजेरी
गेल्या दोन दिवसांपासून उघडीप दिल्यानंतर आज पहाटेपासून कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पहाटेपासूनच कल्याण डोंबिवली परिसरात ढगाळ वातावरण राहिल्याने गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळत आहे. तर रिमझिम स्वरूपात सुरू झालेल्या पावसाचा अधूनमधून जोर वाढताना दिसून येत आहे.
-
१५ वर्षांपूर्वीच्या नळजोडणी घोटाळा प्रकरणात १० पालिका कर्मचाऱ्यांसह ११ जणांची निर्दोष मुक्तता
१५ वर्षांपूर्वीच्या नळजोडणी घोटाळा प्रकरणात १० पालिका कर्मचाऱ्यांसह ११ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. डोंबिवली पश्चिमेतील ‘ह’ प्रभागातील कथित नळजोडणी घोटाळा प्रकरणाचा निकाल लागला आहे. १५ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यात कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाने निर्णय सुनावला आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी, प्लम्बर आणि खासगी व्यक्तीवर संगनमताने नागरिकांकडून पैसे घेऊन बनावट कागदपत्रांद्वारे नळजोडण्या दिल्याचा आरोप होता. दिवंगत नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या तक्रारीनंतर २०११ मध्ये गुन्हा दाखल झाला होता. सबळ पुरावे नसल्याने १० पालिका कर्मचाऱ्यांसह ११ जणांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता झाली आहे.
-
TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरणी आरोपींवरील जामीन अर्जावर सुनावणी
नाशिक- TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरणी संशयित निदा खानसह तौसिफ अत्तार, दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. यापूर्वी संशयित आरोपींचे वकील आणि सरकारी वकील यांचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आज निदा खानसह इतरांच्या जामीन अर्जावर निकाल येण्याची शक्यता आहे.
-
पेट्रोल-डिझेल भरण्यावरील १९० लिटरची मर्यादा १ जुलैपासून हटणार
नाशिक- पेट्रोल-डिझेल भरण्यावरील १९० लिटरची मर्यादा १ जुलैपासून हटणार आहे. केंद्र सरकारने इंधन विक्रीवरील तात्पुरते निर्बंध मागे घेतले आहेत. १ जुलैपासून IOCL, BPCL आणि HPCLच्या सर्व पेट्रोल पंपांवर नवे नियम लागू होणार आहेत. इंधन पुरवठा सुरळीत झाल्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनचालकांना आता पूर्वीप्रमाणे इंधन भरण्यावर १९० लिटरची मर्यादा राहणार नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून याबाबत स्पष्ट आदेश जारी करण्यात आले आहेत.
-
नाशिक महापालिकेच्या आज होणाऱ्या महासभेत ४ हजार पानांची श्वेतपत्रिका सादर होणार
नाशिक महापालिकेच्या आज होणाऱ्या महासभेत ४ हजार पानांची श्वेतपत्रिका सादर होणार आहे. २०२२ ते २०२६ या चार वर्षांतील प्रशासकीय कामकाजाचा लेखाजोखा श्वेतपत्रिकेत असणार आहे. महापौर हिमगौरी आडके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या महासभेत श्वेतपत्रिका सादर होणार आहे. आयुक्त मनिषा खत्री यांच्या निर्देशानुसार सर्व विभागांकडून कामं, खर्च आणि आर्थिक व्यवहारांची माहिती संकलित करण्यात आली आहे. खड्डेमुक्त रस्ते, पाणीपुरवठा, अतिक्रमण हटाव, अपूर्ण विकासकामे, महापालिकेची आर्थिक स्थिती आणि सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी यांसारख्या मुद्द्यांवर महासभेत चर्चा होण्याची शक्यता आहे.
-
शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला विधानसभा उपसभापतीपद जाणार
आज सकाळी १०.३० वाजता उपसभापती पदाबाबत महत्वाचा निर्णय होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला विधानसभा उपसभापतीपद जाणार आहे. शिंदेंच्या शिवसेनेत उपसभापती पदावरून दोन जणांमध्ये मोठी चुरस आहे. चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांच्यात चढाओढ आहे. चंद्रकांत रघुवंशी हे उपसभापती व्हावेत यासाठी जिल्हातील ९ आमदारांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्यात आलं आहे.
राज्यातील काही भागात रविवार रात्रीपासून जोरदार पावसाची नोंद होत आहे. राज्यात विश्रांती घेतलेला मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. राज्यात निम्म्याहून अधिक जून महिना कोरडा गेला. महिना संपत आला तरीही आतापर्यंत सरासरीपेक्षा 52 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान जुलैच्या सुरुवातीला राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. अनेक भागांत मोसमी पाऊस दाखल झाल्यानंतरही हवामान कोरडंच असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण कसं असेल, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. 2 ते 3 जुलै दरम्यान कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यासह देश-विदेशातील, मनोरंजन, क्रीडा आणि इतर क्षेत्रातील अपडेट्स एका क्लिकवर जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा.