Maharashtra News LIVE : राष्ट्रवादीत नाराजी नाट्य? दिल्लीत बड्या घडामोडी

Maharashtra News LIVE Updates: राष्ट्रवादीत काल नाराजीनाट्य पाहायला मिळाले. सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असताना काही वरिष्ठ नेत्यांनी चार हात लांब राहणेच पसंत केल्याचे समोर आले आहे. तर भोंदू खरातचा अजून एक प्रताप समोर आला आहे. त्याने एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Maharashtra News LIVE : राष्ट्रवादीत नाराजी नाट्य? दिल्लीत बड्या घडामोडी
| Updated on: Apr 03, 2026 | 11:29 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 03 Apr 2026 11:45 AM (IST)

    नाशिकमध्ये धुक्याची चादर, द्राक्षं आणि कांदा पीक धोक्यात

    राज्यात एकीकडे अवकाळी पावसाचे थैमान सुरु आहे. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यात धुक्याची चादर पसरल्यामुळे प्रामुख्याने द्राक्ष व कांदा पीक धोक्यात आले आहे. धुक्यांमुळे कांदा पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्षे पिकांवर डाऊनी मिल्ड्यू, द्राक्षमण्यांचा गोडवा कमी होणे अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता महागडी औषधे फवारणी करण्याची वेळ येणार आहे..

     

     

     

     

  • 03 Apr 2026 11:35 AM (IST)

    आळंदी दुहेरी हत्याकांड, पसार आरोपीला काही तासांतच बेड्या; पिंपरी-चिंचवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई

    पुणे जिल्ह्यातील आळंदी जवळील हनुमानवाडी, ठाकरवस्ती येथे घडलेल्या धक्कादायक दुहेरी हत्याकांडातील आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. धनश्री केदारी आणि संगीता शिंदे या आजी-नातीची निर्घृण हत्या करून आरोपी विनायक तुकाराम भवारी  हा घटनास्थळावरून कोणताही पुरावा न सोडता पसार झाला होता. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आळेफाटा येथील पुणे-नाशिक हायवे बायपासवर त्याला जेरबंद केले. तपासादरम्यान आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी अवघ्या काही तासांत या आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.

  • 03 Apr 2026 11:25 AM (IST)

    येरमाळा यात्रेसाठी सोलापूर-धुळे महामार्गावर १० ते १५ किलोमीटरच्या रांगा

    धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेचा आज मुख्य पालखी सोहळ्याचा दिवस आहे. सुमारे १५ लाख भाविक दाखल झाले आहेत. भाविकांच्या या प्रचंड संख्येमुळे आणि महामार्गावर जड वाहनांना प्रवेश दिल्याने सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला १० ते १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे.  तासनतास प्रवासी आणि भाविक वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. प्रशासनाने जड वाहनांचे नियोजन न केल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप केला जात आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस यंत्रणेवर मोठा ताण येत आहे.

  • 03 Apr 2026 11:15 AM (IST)

    सोलापुरात पुतळा अभिवादनावरून पेच: प्रशासन आणि आंदोलक आमनेसामने

    सोलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याच्या मुद्द्यावरून सध्या प्रशासन आणि एका स्थानिक गटात वाद निर्माण झाला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, शासकीय नियमांनुसार पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याची प्रक्रिया प्रशासकीय पातळीवर पार पडेल, मात्र संबंधित गटाने स्वतःच्या हस्ते हार घालण्याची परवानगी मिळावी, अशी आग्रही मागणी केली आहे. या मागणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन यावर काय सुवर्णमध्य काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • 03 Apr 2026 11:00 AM (IST)

    नंदूरबार – वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

    नंदुरबार तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी पडली आहेत. ऐन काढणीच्या टप्प्यातील पिके उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पूर्व भागानंतर आता पश्चिम भागातही वादळी वारे आणि गारपिटीचा मोठा फटका बसला आहे.

  • 03 Apr 2026 10:44 AM (IST)

    आंबेगाव – भक्ष्याच्या शोधत बिबट्या पडला विहिरीत , बचाव कार्य सुरू

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे रात्री भक्ष्याच्या शोधात फिरत असताना एक बिबट्या थेट विहिरीत पडल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, बिबट्याला सुरक्षितरित्या विहिरीतून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

  • 03 Apr 2026 10:36 AM (IST)

    सोलापूर – माढा तालुक्यातील अंजन गावात मराठा समाज आक्रमक

    सोलापूर – माढा तालुक्यातील अंजन गावात मराठा समाज आक्रमक झाला आहे. लक्ष्मण हाके यांनी रस्त्यावर ठिय्या दिल्यानंतर त्या ठिकाणी छत मारले जात असल्याने मराठा समाज आक्रमक झाले असून बेकायदेशीर सुरू असलेल्या आंदोलनाला छत मारू नका अशी मराठा समाजाची मागणी आहे.

  • 03 Apr 2026 10:23 AM (IST)

    मुंबईत रिअल इस्टेट मार्केटमध्ये बूम, घर खरेदीत विलक्षण वा

    मुंबईत रिअल इस्टेट मार्केटमध्ये बूम, घर खरेदीत विलक्षण वाढ झाली आहे.  नाईट फ्रँक इंडियाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राच्या रजिस्ट्रेशन आणि स्टँप विभागाने केलेल्या नोंदणीनुसार मार्च 2026 मध्ये मुंबई महानगर पालिका क्षेत्रात 15,516 हून अधिक प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन झाल्या आहेत.  गेल्या 14 वर्षांतला मार्च महिन्यातील हा सर्वात मोठा आकडा आहे.

  • 03 Apr 2026 10:09 AM (IST)

    मालाडच्या – मालवणीमध्ये गॅस सिलिंडरसाठी मोठी रांग, कुलूप लावून लॉक केले सिलेंडर

    मालाडच्या मालवणीमध्ये एलपीजी गॅस सिलिंडरसाठी मोठी रांग लागली आहे. अनेक लोकं सकाळपासून रिकामा गॅस सिलिंडर घेऊन एचपी गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत. तर काही लोकं, चक्क काल रात्री 10 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत आणि त्यांनी त्यांचे गॅस सिलिंडर कुलूप लावून लॉक केले आहेत.

  • 03 Apr 2026 09:50 AM (IST)

    पुण्यात झालेल्या अवकाळी पावसाने शहरातील 82 ठिकाणी झाडे कोसळली

    काल झालेल्या पावसाने गंगाधाम चौकात होर्डिंग कोसळले आहे. शहरातील अनेक रस्त्यावर आज झाडे बाजूला काढण्याचे काम सुरू. पुण्यात झालेल्या अवकाळी पावसाने एक साठ वर्षे महिलेचा मृत्यू झाला आहे तर अनेक गाड्यांचे नुकसान शहरात वेगवेगळ्या भागात झाल्याचे पाहायला मिळत आहे.

  • 03 Apr 2026 09:40 AM (IST)

    न्याय देवतेने मला न्याय दिला- सतीश भोसले ऊर्फ खोक्या

    मला या लोकांनी पूर्णपणे संपवलं, एका नेत्याला तर टार्गेट करण्यासाठी आदिवासी समाजातील एका पोराला टार्गेट केलं.
    कुटुंबावर तीन वेळा हल्ला झाला कुणीही दखल घेतली नाही. आयुष्यभराच्या कमाईतून उभारलेलं माझं घर पाडलं माझ्या कुटुंबाने एक वर्ष कसे काढले असेल. आमच्या जिल्ह्यात सुरू असलेला जातिवाद आणि वेगळ्या प्रकारच्या राजकारणातून चार-पाच लोकं आहेत जे विष कालवायचं काम करतात.

  • 03 Apr 2026 09:30 AM (IST)

    ठाणे ग्रामीण आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर…

    ठाणे जिल्ह्यातील 716 मंजूर पदापैकी तब्बल 228 पदे रिक्त. अपुऱ्या मनुष्यबळामुळे रुग्णसेवा कोलमडली. ग्रामीण भागातील नागरिकांना तत्पर आणि दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याचे दावे ठाणे जिल्हा परिषदेकडून वारंवार केले जातात मात्र हे दावे केवळ कागदावरच असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे…

  • 03 Apr 2026 09:20 AM (IST)

    अवकाळीचा घाव; काढणीचा कांदा पाण्यात, शेतकरी उद्ध्वस्त

    उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात सलग चार दिवस वादळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातलं आहे. काढणीला आलेला कांदा शेतातच पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचं वर्षभराचं अर्थकारण कोलमडलंय मोठा खर्च, काबाडकष्ट आणि आशा हि सारी स्वप्न उराशी असताना पण अवकाळी पावसाने सगळं पाण्यात गेलं.शेतात उभा असलेला कांदा अक्षरशः सडू लागलाय.

  • 03 Apr 2026 09:05 AM (IST)

    अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान

    उन्हाळी कांद्याला सर्वाधिक फटका. अवकाळीमुळे संपूर्ण कांदा सडून जाण्याची भीती. नाशिकच्या मखमलाबाद मध्ये सर्वाधिक नुकसान. एकरी लाख रुपये खर्च. मात्र ऐन काढणीच्या वेळेतच कांदा खराब झाल्याने शेतकरी हवालदिल..

  • 03 Apr 2026 09:00 AM (IST)

    नाशिक पुन्हा हादरले, व्यावसायिकाकडे 12 लाखांच्या खंडणीची माहिती

    नाशिकमध्ये आणखी एक सेक्स स्कँडल उघडकीस आले.व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. 12 लाखांच्या खंडणीची मागणी केली. 10 हजार स्वीकारताना 4 संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

  • 03 Apr 2026 08:55 AM (IST)

    घरात खूप कॅश यायची, खरातच्या मुलाने SIT चौकशीत धक्कादायक कबुली

    भोंदू अशोक खराब प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा खुलासा समोर आला आहे. सर्व डॅडला माहिती, मात्र घरात खूप कॅश यायची, खरातच्या मुलाने SIT चौकशीत धक्कादायक कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. SIT ने खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली होती. चौकशीदरम्यान मुलाने धक्कादायक कबुली दिली.

  • 03 Apr 2026 08:50 AM (IST)

    चिखलीत रेणुका देवीच्या वहन मिरवणुकीला रात्रीपासून सुरुवात

    बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील रेणुका देवीची यात्रा सुरू आहे. यात्रेचे दुसरे महत्वाचे आकर्षण म्हणजे रेणुका देवीची वहन मिरवणूक .. रेणुका देवीचे वहन मिरवणुक ला आरती नंतर सुरुवात झाली असून हजारो भाविकांनी याठिकाणी गर्दी केलीय.. रात्रीपासून ही वाहन मिरवणूक सुरू असून आज दुपारपर्यंत ही मिरवणूक परत मंदिरात पोहचन्याची शक्यत आहे. . संपूर्ण शहराला प्रदक्षिणा घातल्यावर वहनचा समारोप होत असतो, दरम्याने दर्शनासाठी भाविक गर्दी करतात आणि महिला सुद्धा देवीची ओटी भरभायसाठी गर्दी करतात.

  • 03 Apr 2026 08:45 AM (IST)

    कोकणाप्रमाणे धाराशिवमध्ये ही आंबा नुकसानीचे पंचनामे करून मदत दिली जाणार

    धाराशिव जिल्ह्याला काही गेल्या काही दिवसात अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा मोठा तडाखा बसला. यामध्ये गहू ज्वारी या पिकासह फळबागांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. सर्वाधिक फटका आंबा द्राक्ष केळी या पिकांना बसला. मोठ्या प्रमाणात आंबा पिकाच नुकसान झाल्यामुळे कोकणाप्रमाणे आंबा पिकाचे पंचनामे करून बरी मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांकडून होत असलेल्या मागणीची पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना तसाच सूचना केल्या आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत मिळवून देणार असं सरनाईक यांनी सांगितले.

  • 03 Apr 2026 08:40 AM (IST)

    सतीश उर्फ खोक्या भोसलेची हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता

    सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड न्यायालयाने हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातुन निर्दोष मुक्त केले आहे. एक वर्षापूर्वी सतीश उर्फ खोक्या भोसले याच्यावर ढाकणे पिता पुत्राचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता.यानंतर त्याला छत्रपती संभाजीनगर येथील कारागृहात ठेवण्यात आले होते. काल बीड न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्यानंतर तो आज कारागृहातून बाहेर आला आहे.
    तसेच एका व्यक्तीला बॅटने मारहाण केल्याचा सतीश भोसले याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या प्रकरणात देखील त्याच्यावर गुन्हा दाखल असून ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे सध्या तो बॅटने मारहाण केल्याच्या प्रकरणात जामिनावर आहे. तर हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातुन त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.

     

  • 03 Apr 2026 08:34 AM (IST)

    कल्याण रामबागमध्ये पहाटेची थरारक चोरी

    भर रस्त्यालगत असलेल्या दुकानाचे शटर उचकटून काही मिनिटांत दुकान साफ करत चोरटा फरार झाला. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली. भर रस्त्यावरील दुकान फोडल्याने खळबळ व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वाढत्या चोरींनी चिंता वाढली. महात्मा फुले पोलीसांकडून तपास सुरू करण्यात आला.

  • 03 Apr 2026 08:27 AM (IST)

    जळगाव जिल्ह्यात अवकाळी पाऊस ,गारपीट मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

    जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.रब्बीचे पीक जमीन दोस्त जवारी, मका गहू केळी ला मोठ्या प्रमाणात फटका मोठे नुकसान झाले आहे. मुक्ताईनगर भुसावळ बोदवड रावेर चोपडा अनेक भागांमध्ये अवकाळीचा आणि गारपीटीचा फटका बसला. आधीच नुकसानीची मदत नाही आणि आता पुन्हा एकदा गारपीट आणि अवकाळी चा फटका शेतकरी हवालदिल झाला आहे. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून भरी मदत ची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे

  • 03 Apr 2026 08:23 AM (IST)

    बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्ष पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली

    बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्ष पदावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. राहुल शेवाळे यांच्या निवडीच्या घोषणेवर प्रविण दरेकर यांचे आक्षेप दिसून आला. शेवाळेंना बॉक्सिंगमधील काय समजतं ? असा सवाल दरेकरांनी विचारला आहे. ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दरेकर यांची बॉक्सिंग फेडरेशन अध्यक्ष पदी निवड झाली होती. शेवाळे यांच्या निवडीचा प्रकार कायदा गुंडाळून झाला असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे.

  • 03 Apr 2026 08:20 AM (IST)

    जैन मुनी पद्मसागर यांच्याविरोधात पुण्यात तक्रार

    महाराणी ताराबाईंबाबतच्या वक्तव्यावरून जैन मुनी पद्मसागर यांच्याविरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यात अखंड मराठा समाजाने डेक्कन पोलीस ठाण्यात जैन मुनी पद्मसागर यांच्याविरोधात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. छत्रपती महाराणी ताराबाई यांच्याबाबत अपमानास्पद आणि दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ताराबाई जैन धर्मीय होत्या, असे विधान ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत मराठा समाजाकडून गुन्हा दाखल करून तात्काळ अटकेची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. पक्षातील घटनेत बदल करून अध्यक्षांप्रमाणेच कार्याध्यक्षाला अधिकार देण्याच्या प्रकरणाने मोठी ठिणगी टाकल्याचे समोर येत आहे. काल सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर असतानाही काही वरिष्ठ नेत्यांनी या दौऱ्यापासून चार हात दूर असल्याचे दिसले. लवकरच या घडामोडी समोर येतील. तर भोंदूबाबा खरात याचा अजून खोलात गेला आहे. त्याच्याविरोधात अजून काही महिला समोर आल्या आहेत. त्याच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांची संख्या अजून वाढली आहे. राज्यात अवकाळी पावसाने गेल्या चार दिवसांपासून थैमान घातले आहे. राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाने गव्हासह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. लवकरात लवकर पंचनामा करण्याची मागणी आता करण्यात येत आहे. तर काल पुण्याला पावसाने झोडपून काढल्याने अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. काही घरात पाणी शिरले. ऐन उन्हाळ्यात पावसाने गेल्यावर्षीच्या मुसळधार पावसाची आठवण पुणेकरांना करून दिली. तर संसदेचे विशेष अधिवेशन पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

Follow Us