पोलीस भरतीच्या नियमात बदल, आता लेखी परीक्षा अगोदर होणार!
मुंबई : पोलीस भरतीची वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आता मैदानी चाचणीऐवजी लेखी परीक्षा अगोदर घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा अगोदर घेतल्यामुळे अभ्यास केला तरच उमेदवारांना शारीरिक चाचणीपर्यंत जाता येईल. याशिवाय मैदानी चाचणीला 100 ऐवजी 50 गुण असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासावर लक्ष केंद्रीत […]
मुंबई : पोलीस भरतीची वाट पाहत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आता मैदानी चाचणीऐवजी लेखी परीक्षा अगोदर घेतली जाणार आहे. लेखी परीक्षा अगोदर घेतल्यामुळे अभ्यास केला तरच उमेदवारांना शारीरिक चाचणीपर्यंत जाता येईल. याशिवाय मैदानी चाचणीला 100 ऐवजी 50 गुण असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.
यंदाच्या पोलीस भरतीसाठी गृहविभागाकडून नवे नियम जारी करण्यात आले आहेत. या नियमाचा जीआर काढला जाणार आहे. यानुसार 100 गुणांची मैदानी चाचणी आता फक्त 50 गुणांची असेल. या मैदानी चाचणीअगोदर लेक्षी परीक्षा पास करावी लागेल. लेखी परीक्षेच्या मेरीटमध्ये आल्यानंतरच पुढील चाचणी देता येईल.
लेखी परीक्षेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही परीक्षा नेहमीप्रमाणे 100 गुणांचीच असेल. परीक्षेतील सर्व विषयही नेहमीप्रमाणेच असतील. अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी हे विषय नेहमीप्रमाणेच असतील. लेखी परीक्षेत खुल्या गटाला किमान 35 टक्के, राखीव गटासाठी 33 टक्के गुण मिळवणं आवश्यक आहे. त्यानंतरच मैदानी चाचणीसाठी ते पात्र ठरतील. एका जागेसाठी पंधराऐवजी आता फक्त पाच जण या प्रमाणातच उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावले जाणार आहे.
मैदानी चाचणीत पूर्वी पुरुष उमेदवारांसाठी पाच, तर महिलांसाठी चार प्रकार होते. आता पुरुषांसाठी लांबउडी, पुलअप्स वगळून केवळ तीन आणि महिलांसाठीही लांब उडी वगळून तीनच प्रकार ठेवण्यात आले आहेत.
कशी असेल मैदानी चाचणी?
पुरुषांसाठी – एकूण गुण 50
1600 मीटर धावणे – 30 गुण
100 मीटर धावणे – 10 गुण
गोळाफेक – 10 गुण
महिलांसाठी – एकूण गुण 50
800 मीटर धावणे – 30 गुण
100 मीटर धावणे – 10 गुण
गोळाफेक – 10 गुण
नव्या नियमांवर सुप्रिया सुळेंची टीका
राज्य सरकारच्या नव्या नियमांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. ऐन परीक्षेच्या वेळावर हे बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिवाय लेखी परीक्षा अगोदर घेतल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, असंही त्यांचं म्हणणं आहे.
एक तर पोलिसभरती उशीराने केली आणि त्यातही भरतीचे निकष बदलले.
@CMOMaharashtra नव्या निकषांनुसार शारिरीक क्षमतेपेक्षा लेखी परिक्षेला जास्त महत्व देण्यात आलेय. याचा फटका ग्रामिण भागातील मुलांना बसणार आहे.आपणास विनंती आहे की,ही भरती प्रक्रीया पुर्वीप्रमाणेच राबविण्यात यावी.सरकारने हे बदल अचानक केले आहेत. परीक्षेच्या तोंडावर हे बदल झाल्यामुळे सर्व मुला-मुलींमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.याशिवाय एका जागेसाठी ५ उमेदवार पात्र ठरविले जाणार आहेत. हे प्रमाण एकास पंधरा असे करणे आवश्यक आहे. कृपया याची नोंद घ्यावी ही विनंती.