राज्यात उष्णतेचा कहर, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हवामान खात्याकडून मोठा अलर्ट, कुठे किती तापमान?

मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात उष्णतेची लाट. हवामान खात्याकडून कोणत्या शहरांना अलर्ट. जारी केल्या सूचना.

राज्यात उष्णतेचा कहर, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी हवामान खात्याकडून मोठा अलर्ट, कुठे किती तापमान?
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 01, 2026 | 7:27 AM

Maharashtra Weather : राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुढील काही दिवस राज्यातील कमाल तापमानात साधारण 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. बहुतांश भागात हवामान कोरडे, उष्ण आणि निरभ्र राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

1 मार्च रोजी राज्यात मुख्यत्वे कोरडे आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता अत्यल्प असून उन्हाचा चटका अधिक जाणवू शकतो.

कोकण विभाग

कोकण किनारपट्टीवर उष्ण आणि दमट हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांत उकाडा आणि आर्द्रतेचा त्रास जाणवू शकतो. मुंबई शहरात कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे तर किमान तापमान 23 ते 25 अंशांदरम्यान राहू शकते. सकाळी आणि संध्याकाळी उकाड्याची भावना कायम राहील.

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथे हवामान कोरडे आणि उष्ण राहील. पुण्यात दिवसाचे तापमान झपाट्याने वाढताना जाणवेल तर रात्री तुलनेने थोडा गारवा जाणवू शकतो. मात्र दुपारच्या सुमारास उन्हाची तीव्रता अधिक असेल.

मराठवाडा

मराठवाड्यातील बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव या भागांत उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता आहे. येथे कोरडे वातावरण आणि वाढते तापमान यामुळे दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विदर्भ

विदर्भात तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम,यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा येथे कमाल तापमान काही रित्या वाढण्याची शक्यता आहे.

नागरिकांना सूचना

वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलके आणि सूती कपडे परिधान करणे, तसेच ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

एकूणच, मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात उन्हाचा तडाखा वाढण्याचे संकेत मिळत असून, पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता अधिक जाणवण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Follow Us