हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी निकाल लागला होता… जितेंद्र आव्हाड यांचं मोठं विधान
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष असल्याचा महत्वाचा निकाल कोर्टाने दिलेला आहे. या संदर्भात विविध स्तरातून प्रतिक्रीया उमटलेल्या आहेत. आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात आपली भूमिका मांडली आहे.

कोर्टाने मालेगाव प्रकरणात जो काही निकाल दिला असेल त्याच्या विरोधात किंवा बाजूने बोलण्याचा मला अधिकार नाही. या बॉम्बस्फोटांसाठी ६५ किलो आरडीएक्स कोठून आलं हा प्रश्न अनुत्तरीत आहे. आंतकवादाला जात धर्म, रंग, पंथ नसतो. आतंकवादी हा आतंकवादी असतो. हे उशिरा सुचलेले शहाणपण त्यांना आज सुचत असेल तर ठीक आहे देर आए दुरुस्त आए..हिंदू किंवा मुसलमान यांचा अतिरेकी कारवायांशी संबंध नाही. आतंकवादाला धर्माचं नाव चिकटवणे योग्य नाही हे आधीपासून आम्ही सांगत आहोत असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना जेलमधून बाहेर काढण्यात आले, त्यांचा सत्कार करण्यात आला पेढे वाटण्यात आले ही कायद्याचे पायमल्ली होती.कोर्टाने निकाल दिलेला आहे यावर अधिक काही बोलणं योग्य राहणार नाही. परंतू यात काँग्रेसचा काही संबंध नाही.लोकल बॉम्ब ब्लास्टमधले देखील आरोपी निर्दोष सुटले मग हे काय कुठल्या राजकीय पक्षांनी केलं काय ? ज्या दिवशी हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी या मालेगाव खटल्याचा निकाल लागला होता असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. बॉम्बब्लास्ट झाल्यापासून माझा प्रश्न आहे आरडीएक्स हे तीन-चार आतंकवादी संघटनांकडेच आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांकडे मुबलक आरडीएक्स असते असेही ते म्हणाले.
महादेव मुंडे विरोधात एक महिला पुढे येईल
महादेव मुंडे प्रकरणाचा तपास नीट झालेला नाही हे पुराव्यानिशी सिद्ध होते. या खुना मागचा आका कोण होता आणि कुठल्या आकाने खून केला हे बीडकरांपासून काही लपून राहिलेले नाही. मला जी माहिती बीडमधून मिळते आहे, त्यानुसार एक महिला तयार होईल आणि ती सांगेल की महादेव मुंडेला तिनेच मारले याची संपूर्ण तयारी झालेली आहे. बघू आता ती महिला किती हिंमत दाखवते. त्या महिलेला पुढे केलं जाईल आणि आकाला वाचवण्यासाठी हे केलं जाईल असाही दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
रेव्ह पार्टी कशाला म्हणतात ?
रेव्ह पार्टी कशाला म्हणतात हे ग्रामीण भागात किंवा त्याच्याशी संबंधित नसलेल्यांना माहिती नसेल. रेव्ह पार्टी म्हणजे 100 ते 200 समुदाय एकत्र येणार तिथे मुबलक प्रमाणात दारू असणे, मोठमोठ्याने म्युझिक लावणे, मोठ्या प्रमाणात नाच असे रेव्ह पाटीचे स्वरुप असते. घरात चार-पाच जण काही करत असतील त्याला रेव्ह पार्टी म्हणतात असे माझ्या तरी ऐकण्यात आलेले नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांचे अभिनंदन
जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांशी बोलून विधानभवनात हे प्रकरण मांडण्याचा जोरदार प्रयत्न आपण केला होता. त्याला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरांनाही आपण प्रत्युत्तर दिले होते. लागोपाठ तीनही अधिवेशनामध्ये 20 20 मिनिटं अर्धा- अर्धा तास भाषण करून ज्या आईने आपला मुलगा गमावला त्या आईच्या वेदना मी विधानभवनात एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही रस्त्यावरची लढाई लढत होतो प्रकाश आंबेडकर हे कोर्टामध्ये लढाई लढत होते ,त्यांची लढाई वेगळी आमची लढाई वेगळे होते त्यांच्या लढाईला यश आलं त्यांचा अभिनंदनच केलं पाहिजे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
सरकारला ‘पोलीस राज्यावर’ प्रचंड प्रेम
प्रकाश आंबेडकर यांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं गुन्हे दाखल करा.सुप्रीम कोर्टाने सांगितलं नसतं तर या सरकारने जुमानले नसतं या सरकारला ‘पोलीस राज्यावर’ प्रचंड प्रेम आहे. त्यांच्या ट्विटला त्यांच्या शिवराळ भाषेला उत्तर देण्याची माझी संस्कृती नाही. जेव्हा सुजात आंबेडकरवर फर्ग्युसन कॉलेजमध्ये घोषणाबाजी झाली, मुंबईहून फर्ग्युसन कॉलेजमध्ये जाणारा पहिला माणूस जितेंद्र आव्हाड होता. मला कोणी आंबेडकर समजवायला जाऊ नये, मला कोणाची ऍलर्जी आहे हे सांगण्याचा शहाणपणा कोणीच करू नये असेही ते म्हणाले.
