
जालना, दि.4 फेब्रुवारी 2024 | राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणावरुन निर्माण झालेला वाद संपण्याची चिन्ह दिसत नाही. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी अहमदनगरमधील एल्गार सभेत आक्रमक वक्तव्य केले. त्यांनी न्हावी समाजातील एका व्यक्तीने ओबीसी आरक्षणासंदर्भात पोस्ट टाकली. त्यामुळे त्यांच्या दुकानात न जाण्याचा निर्णय मराठा समाजाने घेतला. आता ते जर तुम्हाला बायपास करत असतील तर सर्व न्हाव्यांनी एकही मराठ्याची हजामत करु नका. त्यांना आपआपसात भादरु द्या, असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्याला मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उत्तर दिले आहे. मग आम्ही दाढी घरीच करु, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला.
भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, ते आमची दाढी करणार नसतील तर मग आम्ही दाढी घरीच करु. त्यांना गरीब लोकांना उपाशी मारायचे आहेत. गरीब मेले पाहिजे, हे त्यांचे स्वप्न आहे. ते बारा बलुतेदारांना ओबीसी आरक्षण मिळू देत नाही. आता त्यांना व्यवसाय करु देत नाही. ओबीसींनो लक्षात ठेवा, मराठाच तुम्हाला साथ देणार आहेत. ते तुम्हाला संपवण्यास निघाले आहे. त्यांची साथ देऊ नका, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
भुजबळांकडे आम्ही लक्ष देत आहे. त्यांचा स्वत:च्या सरकारवर संशय आहे. ते भंगार विचाराचा माणूस आहे. ते ज्या पक्षात जातात, तो पक्षही संपवतात. त्यांनी स्वत:च्या कुटुंबास अडचणीत आणले आहे. त्यांचे संपूर्ण कुटुंब जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे. ओबीसी बांधवांना आरक्षण मिळू देत नाही, ही त्यांची भूमिका आहे. आता व्यवसाय बंद करण्याचे म्हणतोय. परंतु तुम्ही जर मराठ्याचा आरक्षणाच्या विरोधात बोलला तर तुम्हाला सोडणार नाही, असा ईशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
अजित पवार आणि देवेंद्र फडवणीस यांना बदमान करण्याचे काम छगन भुजबळ करत आहे. त्यांनी राजीनामा दिला किंवा नाही दिला आम्हाला काही फरक पडत नाही, असे जरांगे यांनी म्हटले.