तुम्ही मुख्यमंत्री झाले की मी बसलोच उपोषणाला…मनोज जरांगे यांचा थेट देवेंद्र फडणवीस यांना इशारा

महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आपल्याकडून बोलत नाहीत. यामुळे मराठ्यांना लढावेच लागणार आहे. हे दोन्ही बोलत नाहीत म्हणूनच आम्हाला उमेदवार उभे करून त्यांचा सुपडा साफ करायचा होता. परंतु आमचे समीकरण जुळले नाही. तसेच निवडणूक एकाच जातीवर निवडून येणे शक्य नव्हते.

तुम्ही मुख्यमंत्री झाले की मी बसलोच उपोषणाला...मनोज जरांगे यांचा थेट देवेंद्र फडणवीस यांना इशारा
Manoj Jarange Patil-Devendra Fadnavis
| Updated on: Nov 25, 2024 | 3:37 PM

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. त्यानंतर महायुतीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी थेट मनोज जरांगे यांच्यावर हल्ला केला आहे. तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री झाले की मी पुन्हा उपोषणाला बसलोच समजा. तुम्ही पुन्हा या, मी पुन्हा उपोषणास बसतो. काय व्हायचे ते बघू या. आपल्यापाशी सुट्टी नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले, यापूर्वीही तेच होते. दुसरे कोणी नव्हते. मराठे सगळ्यांशी खेटले आहेत. मराठ्यापुढे कोणीही सत्ताधारी नाही. मी मराठ्यांची पोर मोठे करण्याचा ध्यास घेतला आहे. आरक्षण देण्याचे वचन समाजाला दिलेले आहे. पडणारे पडले, निवडून येणारे आले. आपण त्यांचे संसार मोठे केले. आम्ही पडलेला आणि निवडून आलेला दोघांनाही मतदान केलेले आहे. आता या दोघांनी मराठ्यांच्या गोरगरीब पोरांच्या आंदोलनात सहभागी व्हायचे.

तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही

राज्यात कोणाचेही सरकार आले तरी मराठ्यांना काही टेन्शन नाही. कारण कोणीही आले तरी आम्हाला लढावेच लागणार आहे. मागच्या सरकारमध्ये तेच होते. या सरकारमध्ये तेच आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांचे काही सोयर सुतक नाही. आता देशात झाले नाही असे सामूहिक आमरण उपोषण आपण करणार आहोत. आता मराठ्यांचा नाद करायचा नाही. मराठ्यांचे मनगटात बळ आहे. त्यांच्यातही रग आहे. त्यांना तोडीस तोड उत्तर दिले जाईल. तुम्ही आहेतच किती? तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मराठ्यांना खेटू नका अन्यथा…

महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आपल्याकडून बोलत नाहीत. यामुळे मराठ्यांना लढावेच लागणार आहे. हे दोन्ही बोलत नाहीत म्हणूनच आम्हाला उमेदवार उभे करून त्यांचा सुपडा साफ करायचा होता. परंतु आमचे समीकरण जुळले नाही. तसेच निवडणूक एकाच जातीवर निवडून येणे शक्य नव्हते. परंतु माझ्या मराठ्याशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. मराठे गप्प आहेत. शांत आणि संयमी आहे. परंतु त्यांच्या भयंकर आग आहे. ताकत सुद्धा आहे. मराठ्यांना खेटण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असे आव्हान मनोज जरांगे यांनी दिले.

Follow Us