मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार
Manoj Jarange Patil Health : मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक काळकुटे, जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. आज तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा रक्तदाब (BP) आणि रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र जरांगे पाटलांनी तपासणी करण्यासही नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जरांगे पाटलांचा तपासणीला नकार
जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे वैद्यकीय पथक त्यांच्या तपासणीसाठी दाखल झाले होते. मात्र, जरांगे पाटील यांनी वैद्यकीय तपासणी करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे आरोग्य विभागाचे पथक तपासणी न करताच परत गेले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांचा बीपी आणि शुगर कमी झाली असून त्यांना उपचाराची आवश्यकता आहे. त्यांच्या प्रकृतीबाबतचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, उपचार तर सोडाच, वैद्यकीय तपासणीसाठीही ते सहकार्य करत नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सरकार जरांगे पाटलांचा विश्वासघात करते – भास्कर जाधव
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर भाष्य करताना म्हटले की, हैदराबाद गॅझेटच्या तरतुदीनुसार प्रमाणपत्र मिळावे, अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे. सरकार प्रत्येक वेळी नवा जीआर काढते आणि उपोषण सोडवून मनोज जरांगे यांचा विश्वासघात करते. सन 2013 -14 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्याचा काही लोकांना लाभही झाला होता. मात्र आता कितीही प्रयत्न झाले तरी फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देणार नाहीत. फडणवीस हे मराठाद्वेष्टे आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
मराठा बांधवांचा जरांगे पाटलांना पाठिंबा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून मराठा समाज बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी मिळेल त्या वाहनाने अंतरवाली सराटी येथे येताना पाहायला मिळत आहे, मात्र या आंदोलनाला समर्थन म्हणून इचलकरंजी वरून निघालेला मराठा समाज बांधव जवळपास 481 किलोमीटरचा प्रवास करत सायकलने अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा मी असाच सायकलवरून मुंबईला जाणार असल्याचेही त्याने म्हटलं आहे.
