मुख्यमंत्री आमचे शत्रू नाहीत, पण… मनोज जरांगे स्पष्टच बोलले
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यात अंतरावली सराटी येथे महत्त्वाची बैठक झाली. यावेळी जरांगे यांनी ८० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि लाठीचार्जच्या मुद्द्यावरून सरकारवर घणाघाती टीका केली.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची अंतरावली सराटी येथे जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या भेटीदरम्यान मनोज जरांगे यांनी विद्यार्थ्यांची अडकलेली शिष्यवृत्ती आणि आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज या मुद्द्यांवरून सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला.
८० हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली, ६०० कोटी थकले
प्रसाद लाड यांच्याशी बोलताना मनोज जरांगे यांनी शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. जरांगे म्हणाले, “राज्यातील ८० हजार मराठा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती थांबली आहे. मी गेल्या ८ महिन्यांत विखे पाटील यांना अनेकदा फोन करून हा विषय त्यांच्या कानावर घातला. महामंडळाच्या विषयात परतावे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे तब्बल ६०० कोटी रुपये थकले आहेत. यामुळे गरीब मराठा मुलांचे ‘सिबील स्कोअर’ खराब झाले आहेत. मी केवळ आरोप करायचा म्हणून खोटे आरोप करत नाही, तर पुराव्यांसह बोलत आहे.”
मुख्यमंत्री आमचे शत्रू नाहीत, पण…
“अनेक लोकांना वाटते की मी केवळ मुख्यमंत्र्यांवर टीका करतो. पण मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू किंवा दुश्मन नाही. जर ते आमचे शत्रू असते, तर याच मराठा समाजाने त्यांना निवडून दिले नसते,” असे सांगत जरांगे यांनी स्पष्ट केले की, ते कोणत्याही वैयक्तिक द्वेषापोटी नव्हे, तर समाजाच्या आणि मुलांच्या हक्कासाठी भांडत आहेत.
अंतरवाली सराटीतील लाठीचार्जवरून गृहमंत्री फडणवीसांवर तोफ
आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या जखमा अजूनही ताज्या असल्याच्या भावना जरांगे यांनी व्यक्त केल्या. लाठीचार्जचा उल्लेख करताना ते भावूक आणि आक्रमक झाले. “ज्या दिवशी आमच्या माता-भगिनींवर लाठ्या चालवल्या गेल्या, तेव्हा आम्ही गप्प का बसावे? रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला उचलायला पोलीस तयार नव्हते. तिच्या छातीवर पाय देऊन बंदुकीच्या दस्ताने मारण्यात आले. तुम्ही फक्त हे सहन करून दाखवा,” असे आव्हान त्यांनी दिले.
पुढे बोलताना त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही थेट टीका केली. “गृहमंत्री फडणवीस म्हणतात की पोलीस माझे आहेत, पोलिसांना मारले. मग ही जनता तुमची नाही का?” असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला. या बैठकीनंतर आता सरकार मराठा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत आणि इतर मागण्यांवर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
