मनोज जरांगेंना मस्साजोगच्या ग्रामस्थांचा धक्का? घेतला मोठा निर्णय!
मोठी बातमी समोर येत आहे, आज भाजपा आमदार सुरेश धस हे मस्साजोगच्या दौऱ्यावर होते. या भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केला आहे. हा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र त्यानंतर सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी समोर आली. या भेटीवरून मनोज जरांगे पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.
त्यानंतर आता सुरेश धस यांनी आज मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची तसेच तेथील ग्रामस्थांनी भेट घेतली. आपल्या भेटीनंतर त्यांनी मोठा दावा केला आहे. मस्साजोग येथील ग्रामस्थांनी आपल्याला पाठिंबा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सुरेश धस यांच्यावर टीका करत असताना, दुसरीकडे धस यांच्या दाव्यानुसार मस्साजोगच्या ग्रामस्थांनी धस यांना दिलेला पाठिंबा हा मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया?
धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची भेट झाल्यानंतर तुम्ही टीका केली होती, मात्र ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहीर केला आहे, असा प्रश्न यावेळी जरांगे पाटील यांना विचारण्यात आला. यावर त्यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे.
‘त्या विषयात मला काही बोलायचं नाही, तो विषय माझ्यासाठी संपला आहे. मी एवढा जीव लावला होता, समाजाने देखील तळ हातावर घेतलं होतं, एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटण्याची काहीच गरज नव्हती. तुमच्यावर पक्षाचा दबाव होता ना, तर तुम्ही सरळ सांगायला पाहिजे होतं, मी समाजाची गद्दारी करू शकत नाही. माझ्यावर पक्षाचा दबाव आहे असं आमदार धस यांनी म्हणायला पाहिजे होतं. मी माझ्या समाजासाठी पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा देतो, मात्र मी धनंजय मुंडे यांना भेटू शकत नाही, असं धस यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
