निकाल आला अन् 11 जणांनी मारली बाजी ! CET PCB मध्ये 100 पर्सेंटाइलचा पराक्रम
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (MHT CET PCB) कृषी आणि औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमांचा निकाल जाहीर झाला आहे. यात 11 विद्यार्थ्यांनी 100 पसेंटाईल मिळवून बाजी मारली आहे. सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धुळे, पुणे या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. लवकरच अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.

कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी-पीसीबी परीक्षेचा निकाल समोर आला आहे. या परीक्षेत 11 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल मिळवून उल्लेखनीय यश संपादन केलं. सांगली, कोल्हापूर, नागपूर, पालघर, सोलापूर, धुळे , पुणे आणि ठाणे येथील विद्यार्थ्यांनी ही उल्लेखनीय कामगिरी करत मोठं यश मिळवलं आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. दोन टप्प्यांत घेण्यात आलेल्या परीक्षांपैकी पहिल्या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल त्यांच्या लॉगिनद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सामाईक प्रवेश प्रक्रिया (CAP) लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
कधी झाली होती परीक्षा ?
यावर्षी 21 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 या सहा दिवसांमध्ये पीसीबी गटाची सीईटी 11 सत्रांमध्ये घेण्यात आली होती. परीक्षेसाठी एकूण 2 लाख 84 हजार 213 विद्यार्थी बसले. या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1 लाख 3 हजार 360 हे विद्यार्थी तर 1 लाख 69 हजार 484 इतक्या विद्यार्थिनी (मुली ) होत्या, अशी माहिती समोर आली आहे. तर 5 तृतीयपंथीयांनी ही परीक्षा दिली. म्हणजेच विद्यार्थ्यांपेक्षा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनींची संख्या जास्त असल्याचेही समोर आले.
या सीईटी परीक्षेसाठी एकूण उपस्थिती 92.66 टक्के नोंदवण्यात आली. पीसीबी गटाची सीईटी राज्यातील 2 लाख 61 हजार 222 विद्यार्थ्यांनी, तर राज्याबाहेरील 1 हजार 991 विद्यार्थ्यांनी दिली. राज्यातील 36 जिल्ह्यांमधील 186 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा संगणकाधारित पद्धतीने यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली होती.
11 विद्यार्थ्यांना 10 पर्सेंटाईल गुण
एप्रिलमध्ये झालेल्या या सीईटी परीक्षेचा निकाला आला असून त राज्यातील 11 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये नागपूरचा आदित्य सोमाणी, पालघरची झील छेडा, मुंबईचा ॲशले कोस्टॅनसीओ फर्नांडिस, कोल्हापूरचा अथर्व गडदे, सोलापूरची प्रतीक्षा गाढवे, धुळ्याचा अथर्व काकुळडे, सांगलीचा सार्थक पाटील, कोल्हापूरचा साहिम पटवेगर, पुण्याची राशी चोप्रा, ठाण्याचा सौरीश सेन आणि पुण्याचा वरद वैद्य यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल मिळवत उल्लेखनीय कामगिरी करून राज्यभरात आपला ठसा उमटवला.
