मोठी बातमी! विधान परिषदेची निवडणूक घ्यायची गरज आहे का? बड्या नेत्याने का केली मागणी?
MLC Election : राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे राज्यातील विधान परिषदेची निवडणूक घेणे गरजेचे आहे का? असा सवाल एका बड्या नेत्याने केला आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. आजपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशातच आता ही निवडणूक घेण्याची गरज आहे का? असा सवाल राज्यातील एका बड्या नेत्याने उपस्थित केला आहे. देशात सध्या इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाई वाढली आहे, त्यामुळे ही निवडणूक पुढे ढकरण्याबाबत विचार करावा असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का, रोहित पवारांचा सवाल
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले की, ‘आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा निर्माण झाला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, पुण्यात तर जमावबंदीचे देखील आदेश लागू झाले आहेत. अशा स्थितीत विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का ? यावर विचार होणं गरजेचं आहे.’
निवडणुकीत घोडेबाजार होणार
पुढे रोहित पवार यांनी म्हटले की, ‘असंही घोडेबाजार करूनच ह्या निवडणुका होणार आहेत. रिसॉर्ट, पर्यटन, मतदारांचा घोडेबाजार यावर शेकडो कोटी खर्च होतील. त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यातील बिकट परिस्थिती लक्षात घेत या निवडणुका पुढे ढकलायला हव्यात. निवडणुका पुढे गेल्यास या बिकट स्थितीत सरकारला सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल.’
आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंधन तुटवडा निर्माण झाला असून दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे, पुण्यात तर जमावबंदीचे देखील आदेश लागू झाले आहेत. अशा स्थितीत विधानपरिषद निवडणूक घेण्याची गरज आहे का ? यावर विचार होणं गरजेचं आहे.
असंही घोडेबाजार करूनच ह्या निवडणुका होणार…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 25, 2026
विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार – वडेट्टीवार
याआधी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, ‘निवडणुका हा उत्सव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे अनेक नगरसेवक आमच्याही संपर्कात आहेत. त्यांच्याही अतंर्गत प्रचंड वाद आहेत. कोणीही डिसीजन घेतला तर दुसरा गट तयार आहेच आम्हाला मदत करायला. पण आम्ही त्या भानगडीत पडत नाही. जो घोडेबाजार चाललाा आहे, फोडाफोडीचा जो उत्सव चालला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 5-5 लाख देऊन काही नगरसेवकांना उचलण्याचं काम सुरू आहे.’
