MPSC विद्यार्थ्यांसाठी लढणारे रोहित पवार स्वत: मात्र काठावर पास, विद्यार्थ्यांशी बोलताना बरंच काही सांगितलं
MPSC विद्यार्थ्यांसाठी लढणारे रोहित पवार यांनी स्वत: मात्र काठावर पास झाल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. ते लातूरमध्ये विद्यार्थ्यांशी बोलत होते.

महाराष्ट्रात एमपीएससी पेपर फुटल्यानं विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलन करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातही मोठं आंदोलन झालं. पुण्यानंतर आता राज्यातील विविध ठिकाणी विद्यार्थी आंदोलन करू लागले आहेत. लातूरमध्ये पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांशी रोहित पवारांनी संवाद साधला. या आंदोलनात विद्यार्थ्यांशी बोलताना रोहित पवार यांनी बरंच काही सांगितलं. यावेळी त्यांनी परीक्षेत काठावर पास झाल्याचे सांगितले.
लातूरमध्ये विद्यार्थ्यांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, ‘2029 साली बदल होईल. केंद्रात आणि राज्यात जेव्हा बदल होईल. तेव्हा आपण नीट परीक्षा रद्द करू. नीट परीक्षा चालवणारे NTA आणि काही अधिकारी, एजंट यांचे रॅकेट आहे. देशात या रॅकेटची उलाढाल ही हजार कोटींची आहे. नीट पेपर फुटला, त्याची किंमत 70 लाखापर्यंत गेली. मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडील आपली स्वप्ने मारत असतात. कष्ट करून तुम्हाला शिक्षणासाठी प्रोत्साहन देतात. सगळेच क्लासेस काही गडबड करणारे नाहीत. मात्र काही जण आहेत. बारावीनंतर दिली जाणारी CET परीक्षा देखील पारदर्शक नाही, असं मला वाटत वाटते’.
‘ऑफलाईन परीक्षा असेल आणि उत्तर पत्रिकेची कॉपी आपल्याकडे असेल तर परीक्षा चांगल्या होतील , मात्र ऑनलाइन परीक्षा असल्याने काय गडबड होते हे कळत नाही. पैसेवाल्यांनी गुण वाढवून घेऊन चांगले चांगले कॉलेज घेतले. त्यामुळे सामन्यांची मुले चांगल्या शिक्षणापासून वंचित राहिली आहे. जे होतकरू आहेत, अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी आमचा लढा आहे. आता शेतांमध्ये पिके करपली आहेत. सोयाबीन, कपाशी गेली आहे. दुष्काळाची परिस्थती आहे. शेतकरी पालकांना कर्जबाजारी व्हायची वेळ आहे. त्यामुळे CET सारख्या परीक्षा ऑफलाईन घ्यावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
‘MPSC चा पेपर फुटला , FIR करण्यासाठी आम्ही चार तास पोलिस ठाण्यात बसलो, तरी FIR झाला नाही. असा महाराष्ट्र आपणाला घडवायचे आहे का? सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रश्नांवर उतरा. काही लोक, छोटे लोक टिकले नाही पाहिजे, यासाठी कायदे बनविण्याचा प्रयत्न करतात. चांगला कार्यक्रम आयोजित केला. मात्र पुढे मला मोर्चाला जायचे आहे. तेव्हा तीनच प्रश्न घेतो. विद्यार्थ्यांचे प्रश्न सुरू आहेत. वेगवेगळ्या परीक्षा घेण्यापेक्षा एकच परीक्षा असावी, असेही त्यांनी सांगितले.
आमदार, खासदार, मंत्र्यांना परीक्षा का नको, असा प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारला. त्यावेळी मी देखील काठावर पास झालो आहे. नैतिकता बघून निवडून द्या. पैसा हा मुद्दा असू नये, मताला पैसे देणारे खूप आहेत. वीस कोटी रुपये खर्चून निवडून येतात. चांगल्या लोकांना निवडून द्या. परीक्षेतील कॉपीचा उपयोग हा लग्न करण्यासाठी होईल. मात्र भविष्य घडविण्यासाठी होत नाही. आमची सत्ता येईल तेव्हा आम्ही स्कॉलरशिप ही कोणत्याही जातीचा विद्यार्थी असो, तो जर स्कॉलर असेल तर त्याला तीन लाख शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. डिग्री देणे काही कॉलेजने धंदाच करून टाकला आहे. काहीच न शिकवता डिग्री दिली जाते. आम्ही लढतोय, हे सत्ताधाऱ्यांना पटत नाही. त्यामुळे ज्या संस्थेत काम करतो, त्या संस्था अडचणीत आणण्याचे काम सुरू आहे. आम्ही लढणार आहोत, कोर्टात देखील लढत आहोत, असेही त्यांनी म्हटलं.
