उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली, दर महिन्याला रीचार्ज घेतात – बाळ माने यांचे विनायक राऊतांवर गंभीर आरोप
विधान परिषद निवडणुकीत बाळ माने यांच्या माघारीने ठाकरे गटात खळबळ उडाली. माने यांनी माघारीनंतर आपली भूमिका स्पष्ट करत, विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. पक्षाची बेइज्जती टाळण्यासाठी ही 'यशस्वी माघार' घेतल्याचे ते म्हणाले. आपली हकालपट्टी विनायक राऊत यांच्यामुळे झाल्याचा दावा करत, माने यांनी त्यांच्या राजकीय भविष्याबद्दलही सूचक वक्तव्य केले.

सध्या राज्यात विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच अनेक राजकीय घडामोडींनाही वेग आला. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालचा दिवस होता. अनेक बंडखोरांनी कालचा दिवस गाडवला. त्यांना शात करताना महायुतीचे नेते दिसत होते. तर महाविकास आघआडीमध्ये उलट चित्र होतं. काही जणांनी काल अचानक निवडणुकीतून माघार घेतली. याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी काल उमेदवारी मागे घेतली आणि त्यानंतर त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.न त्यानंतर माने यांनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवलं होतं.
कालच्या घडामोडींनंतर बाळ माने हे आज थेट मुंबईत दाखल झाले असून टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी कालच्या माघारीच्या निर्णयावर सविस्तर प्रतिक्रिया दिली. तसेच यावेळी त्यांनी विनायत राऊत यांच्यावर काही गंभीर आरोपही केले. विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केले, ते शिंदे सेनेतील काही नेत्यांकडून दर महिन्याला रीचार्ज घेतात असा घणाघाती आरोप माने यांनी केला. तसेच पुढल्या वाटचालीबद्दलही त्यांनी भाष्य केलं.
काय म्हणाले बाळ माने ?
राजकारणात यशस्वी माघार घेणं, दोन पावलं जाणं योग्य असतं. मी निवडणुकीला उभं राहून मला जर फक्त 55 मतं मिळाली असती, माझ्या पक्षाची,आणि महाविकास आघआडीची मत पडली नसती तर ती जी बेइज्जती झाली असती, त्यापेक्षा काल यशस्वी माघार घेऊन आम्ही कोकणात एक चांगला पायंडा आम्ही पाडला. घोडेबाजार आम्ही केला, हेच वारंवार सांगतोय. पण मला न विचारात, काहीही चर्चा न करता निर्णय घेण्यात आला. एखादा माणूस चुकीचा वागला असं वाटत असेल तर कारण विचारल पाहिजे, कारणे दाखवा नोटीस दिली पाहिजे. मी उपनेता आहे, 40 वर्ष सामाजिक , राजकीय क्षेत्रात काम करतोय, 5 वर्ष मी आमदार म्हणून काम केलं आहे, असं माने म्हणाले.
लोकं काय बोलतात, आत्मपरीक्षण करा, मानेंचा विनायक राऊतांवर निशाणा
संजय राऊत साहेबांनी माझी हकालपट्टी केल्याचा निर्णय जाहीर केला. टीव्हीवर मी ते पाहिलं , पण एकदा संजय राऊतांनी माझी हकालपट्टी केल्यावर विनायक राऊत डोमकावळ्यासारखे चिवचिव करत तिथे आले आणि म्हणाले , हे घेतलं, ते घेतलं, आर्थिक व्यवहार झाले. ओ विनायक राऊत साहेब तुम्ही कोणावर बोलता? आपल्या पक्षातील लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, याचं आत्मपरीक्षण करा, असा सला माने यांनी राऊत यांना दिला.
लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंशी बेईमानी केली
तुम्ही 2024 साली तुमची रत्नागिरीची, सिंधुदुर्गची लोकसभा निवडणूक जिंकण्याकरता पालघरच्या फर्न हॉटेलमध्ये काय करत होता ? त्या ठिकाणी तुम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी बेईमानी केली आणि तिथला लोकसभेचा खासदार पडला. पालघर जिल्ह्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून, आनंद दिघे यांच्या काळापासूनच काम आहे, मतदार आहेत , त्या तिथल्या निवडणूकीत तुम्ही हाराकिरी केली, असे आरोप माने यांनी केले.
माझ्या निवडणुकीच्यावेळेसही माझा प्रवेश होण्याकरता एक महिना विलंब तुम्ही केलात. तुम्ही कोणाची सुपारी घेतली होती ? मातोश्रीवरती कोण महिला कलाकार मागच्या दाराने येत होत्या तुम्हाला विनंती करायला ? उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट दिली नाही. तुमच्या पक्षाकडून बाळ मानेला उमेदवारी देऊ नका असं त्या महिला कलाकारांचं म्हणणं होतं, माझ्याबद्दल एवढी भीती का होती ? असा सवाल माने यांनी विचारला.
त्यावेळेलासुद्धा शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख , तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख ही सगळी विनायक राऊतांची मंडळी होती. यांनी पैसे घेऊन बेईमानी केली, गद्दारी केली आणि मला मतदान केलं नाही हा इतिहास रत्नागिरीतल्या सगळ्यांना माहीत आहे. हे विनायक राऊत यांच्यात परवानगीने झालं, असा आरोप माने यांनी केला.
तर मी राजकारणातून संन्यास घेईन
रत्नागिरीतले पूर्वीचे जे संबंध आहेत, त्या संबंधाला मदत करून आपली संघटना कुठेही गेली, देशोधडीला लागली तरी चालेल. पण जुने संबंध राखणे आणि दर महिन्याला शिंदे सेनेच्या काही नेत्यांकडून रीचार्ज घेणं हे विनायक राऊत यांचं काम आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. ते मिसगाईड करतात आणि 50 हजारांपासून कितीही रक्कम घेतात. त्यामुळे मी एवढे पैसे घेतो वगैरे आरोप विनायक राऊतांनी माझ्यावर करण्यापेक्षा आपलं जपा, संघटना वाढवूया, तुमची संघटना वाढवूया, असं माने म्हणाले. मी काही आर्थिक व्यवहार केलेत, पैसे घेतले हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असं आव्हानही त्यांनी दिलं.
