20 वर्षांचा प्रवास, पण आता जड अंतःकरणाने… भाजपात प्रवेश करताच राज ठाकरेंच्या विश्वासू शिलेदाराचा पहिला मोठा गौप्यस्फोट
डोंबिवलीत मनसेला मोठा धक्का बसला असून शहराध्यक्ष मनोज घरत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पॅनलमधील गोंधळ आणि उबाठा गटासोबतच्या संघर्षामुळे नाराज होऊन त्यांनी राज ठाकरेंची २० वर्षांची साथ सोडली.

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. असे असतानाच डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा धक्का बसला आहे. डोंबिवलीचे मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. मनोज घरत हे गेल्या दोन दशकांपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे आता कमळ हातात घेतल्याने शहराच्या राजकीय समीकरणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनोज घरत यांचा आरोप
मनोज घरत हे डोंबिवलीत मनसेचा मुख्य चेहरा होते. मात्र, गेल्या काही काळापासून स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी आणि विशेषतः उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांचा संघर्ष सुरू होता. तसेच पॅनलमधील उमेदवारी आणि प्रचारातील विसंवाद यामुळे ते नाराज होते. अखेर त्यांनी जड अंतकरणाने मनसे सोडण्याचा निर्णय घेतला. मनोज घरत यांनी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. यानंतर बोलताना त्यांनी अनेक आरोप केले.
पॅनलची परिस्थिती अत्यंत वाईट झाली होती. उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या वरिष्ठांचे आदेश पाळले नाहीत. एकाच पॅनलमध्ये मनसे आणि उबाठा या दोघांचेही उमेदवार रिंगणात उतरले होते. अशा गोंधळाच्या परिस्थितीत ठाकरे ब्रँड लोकांसमोर कसा न्यायचा, हा मोठा प्रश्न आमच्यासमोर होता, असे मनोज घरत यांनी सांगितले.
भाजपमध्ये तिकीटासाठी आलेलो नाही
भाजप हा मोठा राष्ट्रीय पक्ष आहे. केंद्र आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातूनच मिळू शकतो. दुसऱ्या पक्षाचे या ठिकाणी काही चालत नाही, त्यामुळे सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर हा निर्णय घेतल्याचे मनोज घरत यांनी म्हटले. मी भाजपमध्ये तिकीटासाठी आलेलो नाही. मनससोबत २० वर्षांचा प्रवास होता. त्यामुळे जड अंतकरणाने हा निर्णय घेतला. पण कार्यकर्त्यांच्या भावना आणि भविष्यातील कामाचा विचार करणे आवश्यक होते, असेही त्यांनी म्हटले.
मनोज घरत यांच्या पक्षबदलावर संजय राऊत यांनी टीका केली होती. त्याला उत्तर देताना घरत म्हणाले, संजय राऊत हे मोठे नेते आहेत, त्यांनी आरोप करावेत. एखादा लहान कार्यकर्ता पक्ष सोडून गेला की त्याच्यावर आरोप करण्याची पद्धतच आहे, पण आम्ही अशा आरोपांना भीक घालत नाही. मी जे काही केले ते माझ्या सहकाऱ्यांच्या संमतीने केले आहे. राज साहेबांसोबत अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्याबद्दल मनात चांगल्याच आठवणी राहतील. आता भाजपमध्ये जे काही पद मिळेल, त्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम करू,” असे मनोज घरत यांनी स्पष्ट केले.
