राज ठाकरेंचा अत्यंत निकटवर्तीयाचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; प्रकृती कशी?
मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला असून, त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. वाचा सविस्तर बातमी.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे सत्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) धडाडीचे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे दिलीप बापू धोत्रे यांच्या गाडीला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात धोत्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दिलीप धोत्रे हे आपल्या खाजगी वाहनाने मुंबईहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्याचवेळी समोर येणाऱ्या एका वाहनाना त्यांच्या एक्सप्रेसवेवरील गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांच्या गाडीचा पुढचा भाग अक्षरश:चक्काचूर झाला. यामुळे गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
हा अपघात कसा आणि कधी झाला, त्याचे नेमके कारण काय, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दिलीप धोत्रे यांची प्रकृती आता कशी?
या अपघातात दिलीप धोत्रे यांच्या छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्यांना तातडीने पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर उपचार करत आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पंढरपूरमधील त्यांचे समर्थक आणि मनसे कार्यकर्ते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
दिलीप धोत्रे हे पंढरपूर भागातील मनसेचे वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध असल्याने राजकीय वर्तुळात या बातमीने खळबळ उडाली आहे.
दिलीप धोत्रे यांचा अल्पपिरचय
- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात विद्यार्थी दशेपासून राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून केली.
- इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या धोत्रे यांनी १९९२ मध्ये पंढरपूर कॉलेजच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद भूषवत आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवली होती.
- राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून सर्वप्रथम त्यांना साथ देणारे ते महत्त्वाचे शिलेदार ठरले.
- जिल्हा संघटक, शाडो सहकारमंत्री आणि प्रदेश सरचिटणीस अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या.
- त्यांनी सोलापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी मोलाचे योगदान दिले आहे. याच निष्ठेची दखल घेत नुकतीच त्यांची पक्षाच्या नेतेपदी वर्णी लागली होती.
