मान्सून लाबंला… राज्याच्या या भागावर दुष्काळाचे सावट, हवामान विभागाच्या माहितीने शेतकरी चिंतेत

Monsoon Rain in Maharashtra : मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे आता मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमनही लांबणार आहे. तसेच यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मान्सून लाबंला... राज्याच्या या भागावर दुष्काळाचे सावट, हवामान विभागाच्या माहितीने शेतकरी चिंतेत
Low Rainfall In Vidarbha Drought Fear Grows
Image Credit source: Google
| Updated on: Jun 02, 2026 | 7:38 PM

राज्यासह संपूर्ण देशातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र अद्यापही मान्सून केरळमध्ये दाखल झालेला नाही. त्यामुळे आता मान्सूनचे महाराष्ट्रातील आगमनही लांबणार आहे. तसेच यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, त्यामुळे राज्याच्या काही भागावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. हवामान विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

विदर्भात पावसाचे प्रमाण कमी राहणार

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी सांगितले की, ‘विदर्भात या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. यंदा 92 ते 94 टक्के पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात अलनिनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहणार असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. विदर्भात मान्सून 10 ते 15 जून पर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यावर्षी कमी पाऊस पडणार असल्याने शेती सह अनेक क्षेत्रावर त्याचा प्रभाव पडणार आहे.’

शेतीला मोठा फटका बसण्याची शक्यता

प्रवीण कुमार यांनी पुढे बोलताना सांगितले की, लॉन्ग रेंज फोरकास्ट हवामान विभागाने जारी केला त्यानुसार संपूर्ण भारतात मान्सून कमजोर राहणार आहे. सरासरी 92% पाऊस पडणार आहे. विदर्भाच्या जास्तीत जास्त क्षेत्रामध्ये पाऊस सामान्य पेक्षा कमी होण्याचे शक्यता आहे. अजून पर्यंत केरळ पर्यंत मान्सून पोहोचला नसल्याने सध्या सांगता येणार नाही मात्र विदर्भात मान्सूनची स्थिती ही सामान्य आणि कमजोर राहण्याची शक्यता आहे. याचा मोठा फटका शेतीला बसू शकतो.

महाराष्ट्रात 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही

महाराष्ट्रात 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. अरबी समुद्रात मॉन्सून सक्रिय होण्याची कुठली चिन्ह नाहीत, त्यामुळे चिंता वाढली आहे. अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल झालेली परिस्थिती पुन्हा बदलली आहे, त्यामुळे मान्सून लांबला आहे. केरळला मान्सून पोहोचल्यानंतर हवामानातील बदल, वाऱ्याचा वेग आणि समुद्रातील स्थिती यावर मान्सूनची वाटचाल अवलंबून असणार आहे. त्यामुळे दमदार आणि चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरणी करू नये असा सल्ला देण्यात आला आहे.

 

Follow Us